भांडणात आईची बाजू घेणाऱ्या मुलाचा वडिलांकडून निर्घृण खून

आखाडा बाळापुर ( हिंगोली ) :  पोलीसनामा ऑनलाईन – आई-वडिलांच्या भांडणात तेरा वर्षाचा मुलगा आईची बाजू घेत असल्याच्या कारणावरुन वडिलांनी त्याचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना कळमनुरी तालुक्यातील येडशी येथे घडली आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.२८) रात्री अडीच ते साडेतीनच्या दरम्यान घडली असून पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे.

वैभव बाबुराव शिखरे (वय-१३) असे खून झालेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी बाबुराव भगवानराव शिखरे(वय-३५ रा. येडशी, ता. कळमनुरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी वडिलांचे नाव आहे.याप्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील येडशी येथील रहिवाशी असलेल्या बाबुराव शिखरे हा मद्यपी आहे. यामुळे याचे बायकोसोबत सतत भांडण होतात. भांडणा दरम्यान तो बायकोला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मारहाण करतो.

यावेळी त्यांचा १३ वर्षीय मुलगा वैभव आईच्या बाजूने राहतो याचा बाबुरावला राग होता. शुक्रवारी मध्यरात्री शिखरेने वैभवला ‘तुला मामा कडे घेऊन जातो’ असे सांगून स्वतःच्या ऑटोरिक्षामध्ये बसवले.दरम्यान, शिखरेने मध्यरात्री २ ते ३ वाजे दरम्यान नांदेड-हिंगोली रोड वरील कुर्तडी पाटीजवळ रिक्षा थांबवला आणि अचानक वैभवचा दोरीने गळा आवळला. वैभव तडफडत आहे पण त्याचा जीव जात नाही हे पाहताच त्याचे डोके रिक्षावर जोरजोरात आदळले. असे करूनही जीव जात नाही हे पाहून त्याने वैभवच्या डोक्यात मोठा दगड घातला. यात वैभवच्या डोक्याचा चेंदामेंदा होत जागीच मृत्यू झाला.

वैभवला मारल्यानंतर शिखरेने मृतदेह रिक्षात टाकून आपल्या मावस भावाच्या दारात पायरीवर आणून ठेवला. तसेच,मी मुलाचा खून केला असे ओरडू लागला. यानंतर ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक गणपत राहिरे, फौजदार सविता बोधनकर, संतोष नागरगोजे,  गजानन भालेराव, गजानन मुलगीर आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.