वैभव बाबुराव शिखरे (वय-१३) असे खून झालेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी बाबुराव भगवानराव शिखरे(वय-३५ रा. येडशी, ता. कळमनुरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी वडिलांचे नाव आहे.याप्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील येडशी येथील रहिवाशी असलेल्या बाबुराव शिखरे हा मद्यपी आहे. यामुळे याचे बायकोसोबत सतत भांडण होतात. भांडणा दरम्यान तो बायकोला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मारहाण करतो.
यावेळी त्यांचा १३ वर्षीय मुलगा वैभव आईच्या बाजूने राहतो याचा बाबुरावला राग होता. शुक्रवारी मध्यरात्री शिखरेने वैभवला ‘तुला मामा कडे घेऊन जातो’ असे सांगून स्वतःच्या ऑटोरिक्षामध्ये बसवले.दरम्यान, शिखरेने मध्यरात्री २ ते ३ वाजे दरम्यान नांदेड-हिंगोली रोड वरील कुर्तडी पाटीजवळ रिक्षा थांबवला आणि अचानक वैभवचा दोरीने गळा आवळला. वैभव तडफडत आहे पण त्याचा जीव जात नाही हे पाहताच त्याचे डोके रिक्षावर जोरजोरात आदळले. असे करूनही जीव जात नाही हे पाहून त्याने वैभवच्या डोक्यात मोठा दगड घातला. यात वैभवच्या डोक्याचा चेंदामेंदा होत जागीच मृत्यू झाला.