PM केअर फंडातून मिळालेले 58 व्हेंटिलेटर धूळखात, ससूनच्या डिनची अजित पवारांकडे तक्रार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना लसीच्या तुटवड्यावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरु झाला आहे. ठाकरे सरकारमधील नेते आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत पीएम केअर फंडातून ससूनला  मिळालेले 58 व्हेंटिलेटर खराब निघाले आहेत. याबाबत ससून रुग्णालयाचे डिन डॉ. मुरलीधर तांबे यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे  तक्रार केली आहे. व्हेंटिलेटर सारखे बंद पडतात, पूर्ण क्षमतेन चालत नसल्याने ते धूळ खात पडून आहेत, अशी तक्रार केली आहे. यामुळे व्हेंटिलेटरच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्यात बिगर भाजप सरकार असल्याने केंद्र सरकार राज्यावर अन्याय करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला आहे. यामुळे केंद्राकडून आरोग्य सुविधा पुरवताना दुजाभाव होत आहे, असेही या नेत्यांचे म्हणणे आहे. कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकार दुजाभाव करत असल्याची टीका केली आहे. महाराष्ट्राला फक्त लसी देण्यातच नाही तर कोरोना काळात महत्वाची वैद्यकीय उपकरणे देण्यातसुद्धा केंद्राने दुजाभाव केला आहे. लोकसभेतील आकडेवारीनुसार गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यात रुग्णसंख्येपेक्षा जास्त पटीने  N95 मास्क, पीपीई किट्स आणि व्हेंटीलेटर्स केंद्र सरकारने दिल्याचा घणाघाती आरोप चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे या आरोपांवर केंद्र सरकारकडून काय स्पष्टीकरण दिली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.