धक्कादायक…नवविवाहित महिलेची पेटवून घेऊन आत्महत्या

मिरज : पोलिसनामा ऑनलाइन

तालुक्यातील खटाव गावामधील नवविवाहित महिलेने राॅकेल अंगावर ओतून घेत स्वतःला पेटवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

आरती अविनाश पाटील (वय 20)असे मृत महिलेचे नाव आहे. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. मात्र आत्महत्तेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , नुकताच आरतीचा विवाह कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील अविनाश पाटील यांच्याशी झाला होता. आरतीचे शिक्षण पदवीपर्यंत तर, तिच्या पतीचे दहावीपर्यंत शिक्षण झाले होते. आरती आपल्या माहेरी आली होती. आपल्या माहेरीच तीने सकाळी साडेसात दरम्यान शेतातील शेडमध्ये अंगावर राॅकेल ओतून घेऊन पेटवून घेतले. दरम्यान तिने आरडाआेरड केल्याने, घरातील आई, वडील व भाऊ धावत शेडकडे गेले असता, आरतीने पेटवून घेतल्याचं त्यांच्या लक्षात आले, त्यांनी लवकरच आरतीला मिरज येथिल एका रुग्णालयात दाखल केले मात्र, उपचारादम्यान तिची प्राणज्योत मालवली.