धक्कादायक ! लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्याने पत्नीची आत्महत्या

शाहदारा : वृत्तसंस्था – पतीने लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत म्हणून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शाहदारा जिल्ह्यातील मानससोवर पार्क परिसरात घडली आहे. पतीने शुभेच्छा दिल्या नसल्याचा राग आल्याने तिने आपले जीवन संपवले. आकांक्षा (वय-27) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट मिळाली नाही. तर मृत महिलेच्या माहेरच्या लोकांनी हुंडा दिला नसल्यामुळे तिचा छळ केला जात होता, असा आरोप केला आहे. मृत आकांक्षा नत्थू कॉलनी परिसरात कुटुंबासमवेत राहात होती. आकांक्षा ही सरकारी शाळेत शिक्षिका होती तर तिचा पती अंकित हा एका खासगी कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करतो. या दोघांचे लग्न 11 मे 2018 रोजी झाले होते. आकांक्षाच्या आईने सांगितले की, सोमवारी सायंकाळी तिच्या सासरच्या लोकांनी तुम्ही ताबडतोब घरी या, आकांक्षाला तुमच्या सोबत बोलायचे आहे, असे सांगितले. घरी पोहचताच तिच्या मृत्यूची बातमी मिळाली. सासरच्या लोकांनी सांगितले की, तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

अंकितने घटनास्थळी असलेल्या पोलिसांना सांगितले की, सोमवारी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. तो आपल्या पत्नीला शुभेच्छा देण्यास विसरला. याचा राग आल्यावर तिने हे पाऊल उचलले. त्याचवेळी आकांक्षाच्या आईने आरोप केला की, तिच्या मुलीला तिच्या सासरच्यांकडून त्रास देण्यात येत होता. सासरचे लोक तिचा पगार काढून घेत होते. यासह तिला मूल नसल्याने टोमणे मारत असत. आकांक्षाच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपानुसार पोलीस तपास करत आहेत.