नगर जिल्ह्यात ‘घोडे’बाजार तेजीत; बंदुकबाजांच्या मुसक्या आवळण्याचे गृहराज्यमंत्र्यांचे आदेश

अहमदनगर : पोलीसनामा आॅनलाईन

अहमदनगर जिल्ह्यातील वाढत्या खुनाच्या घटना पाहता चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कालपरवाच झालेल्या दोन्ही हत्या या गोळ्या झाडून झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गावठी कट्टे पोलिसांच्या रडारवर आहेत. शस्त्रे पकडण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. केसरकर हे आज (सोमवार दिनांक 30) सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आले होते. जामखेड दुहेरी हत्याकांडाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केसरकर म्हणाले जामखेड दुहेरी हत्याकांड दुर्देवी आहे. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना केसरकर म्हणाले की, जिल्ह्यातील बेकायदेशीर हत्यारं आणि गावठी कट्टे समूळ नष्ट करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. या संदर्भात नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे आणि पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याशी आज चर्चा झाली. या बाबतची अंमलबजावणी लवकरच दिसेल. तर गावठी कट्ट्याचं खापर त्यांनी शेजारच्या राज्यांवर फोडलं आहे.

जिल्ह्यातील अवैध वाळू तस्करी, हॉटेल व्यावसायिक, लॅंन्डमाफिया यांना सोडणार नाही, सध्याच्या परस्थितीत लोकांना दिलासा देणं गरजेचे आहे. तसेच शेजारच्या जिल्ह्यातील नाशिक औरंगाबादच्या तुलनेत पोलीस कमी आहेत. मात्र अाढावा बैठकीत पोलीस संख्या वाढवण्याचा प्रयत्न आहे. तर स्वतंत्र गृहमंत्री पदावर बोलताना मुख्यमंत्री काम करत आहे. ते राज्याचा कारभार हाकत आहेत. अनेक सकारात्मक गोष्टी केल्या आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडलेली स्वतंत्र गृहमंत्र्यांच्या भुमीकेवर मी बोलणं उचीत होणार नाही, असेही ते म्हणाले.