औरंगाबादमध्ये ‘रेमडेसिवीर’चा तुटवडा !

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाच औरंगाबाद जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठयावर परिणाम झाला आहे. दोन दिवसांपासून निर्माण झालेला तुटवडा सुरळीत होऊ शकतो, असे अन्न व औषधी विभागातील अधिकार्‍यांचे मत आहे.

कृत्रिम प्राणवायूचा पुरवठा अगदी हातघाईवर आला नसला तरी त्याचे परिणाम होऊ शकतात. मागणी केलेला कृत्रिम प्राणवायू आणि इंजेक्शन शिल्लक उरत नसल्याने प्रशासनाच्या कसरतीचा काळ सुरू झाला आहे. दरम्यान ‘आयनॉक्स’ या एकमेव ‘ऑक्सिजन’ उत्पादन कंपनीबरोबरच आता ‘लिंडे’ व ‘जेएसडब्ल्यू’ या कंपन्यांकडूनही कृत्रिम प्राणवायू मागविण्यात आला आहे. मात्र, त्याच्या वाहतुकीसाठी लागणार्‍या टँकरची समस्या प्रशासनासमोरची असल्याचे सांगण्यात येत आहे.रुग्णसंख्या तर वाढत असून कृत्रिम प्राणवायूची गरज भासण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे औषधांचा वापरही वाढविला जात आहे. गेल्या दोन दिवसापासून रेमडेसिवीर या इंजेक्शनच्या केवळ 160 कुप्या आल्या होत्या. तत्पूर्वी हे प्रमाण 240 एवढे होते. त्यामुळे इंजेक्शनची कमतरता भासत असल्याचे विविध रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येते. या अनुषंगाने अन्न व औषधी विभागाचे सहसंचालक संजय काळे यांनी दोन दिवसापासून उत्पादक कंपनीकडूनच पुरेसा पुरवठा होत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. सोमवापर्यंत हा पुरवठा सुरळीत होईल असे सांगितले आहे.