शेतकरी आंदोलनाला युवा फलंदाज शुबमन गिलच्या कुटुंबीयांचा पाठिंबा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा युवा फलंदाज शुबमन गिल याच्या कुटुंबीयांनीही सध्या सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ते शेतकरी आंदोलनाच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत.

नव्या कृषी कायद्याविरोधात उत्तर भारतामध्ये शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू असून, यामुळे संपूर्ण भारतीयांचे त्याकडे लक्ष लागले आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना ‘पद्म विभूषण’ पुरस्कार परत केलाय.

जलालाबादजवळ चक खेरे हे गाव असलेल्या शुबमनचे कुटुंबीय शेतकरी आहेत. शुबमनचे आजोबा दीदारसिंह यांनी नव्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलनामध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यांचे वय लक्षात घेता त्यांना आंदोलनस्थळी जाण्यापासून शुबमनचे वडील लखविंदर सिंह यांनी रोखले. ते म्हणाले, “माझ्या वडिलांनाही आंदोलनामध्ये सहभागी व्हायचे होते, परंतु आम्ही त्यांना न जाण्याची विनंती केलीय.”

”शुबमनलाही लहानपणापासून शेतीची आवड आहे. त्यानं गावात असताना बराच काळ शेतात घालवला आहे. कुटुंबातील सदस्यांना शेतात काम करताना त्यानं पाहिलं आहे. त्यानेही शेतात काम केलं आहे. हे आंदोलन शेतकर्‍यांसाठी किती महत्त्वाचे आहे, याची त्याला जाण आहे. तो क्रिकेटपटू झाला नसता, तर शेतकरी नक्कीच झाला असता, ”असे लखविंदरसिंह म्हणाले.

”तो गावाशी प्रचंड अटॅच आहे आणि लहानपणी शेतात क्रिकेट खेळायचा. त्याला आजही शेती करण्याची आवड असून, क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर गावात येऊन शेती करणार आहे, असे तो नेहमी सांगतो, असेही त्यांनी सांगितले आहे.