सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरण : बिहारच्या पोलिस महासंचालकांनी मुंबई पोलिसांना सुनावलं, म्हणाले – ‘आता तोंड का लपवताय’

नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाला प्रत्येक क्षणाला वेगळे वळण मिळत आहे. बिहार पोलिसांची एक टीम शनिवारी सायंकाळी सुशांत सिंहची माजी मॅनेजर दिशा सल्याणच्या अनैसर्गिक मृत्यूबाबत मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात चौकशी करण्यासाठी गेली होती. यावेळी मुंबई पोलिसांनी सर्व माहिती देण्याचे आश्वासन दिले, पण त्याच वेळी एक कॉल आल्यानंतर सर्व वातावरण बदलले, असे आजतकने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

मुंबई पोलिसांनी बिहारहून आलेल्या टीमला सांगितले की, दिशाचा एक फोल्डर नकळत डिलीट करण्यात आला आहे आणि तो आता सापडू शकत नाही. बिहार पोलिसांना दिशाचा लॅपटॉप देण्यास सुद्धा मुंबई पोलिसांनी नकार दिला. बिहार पोलीस रविवारी दिशाच्या कुटुंबातील सदस्यांचे जबाब घेण्यासाठी गेले होते, परंतु कुटुंबाचा कुणीही सदस्य मिळाला नाही. बिहार पोलीस त्या चावीवाल्याचा सुद्धा शोध घेत आहेत, ज्याने सुशांतच्या दरवाजाचे लॉक उघडले होते.

या संपूर्ण प्रकरणावर बिहार पोलीसचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी आजतकशी चर्चा केली. मुंबई पोलिसांच्या वागण्याबात त्यांनी म्हटले की, देशातील सर्व राज्यातील पोलीस आमच्या येथे येतात, परंतु कुणीही अद्याप तक्रार केली नाही की, बिहार पोलिसांनी सहकार्य केले नाही. आम्ही बाहेरून आलेल्या पोलिसांना सर्व प्रकारे मदत करतो. म्हणून आम्ही सुद्धा अपेक्षा करतो की, आम्हालाही तसेच सहकार्य मिळेल.

दिशाचे फोल्डर डिलीट होण्याच्या प्रश्नावर डीजीपी गुप्तेश्वर पांडे म्हणाले की, देशातील जनता सर्व पहात आहेत. देशाच्या मनात कुठे ना कुठे प्रश्न आहे. काहीतरी संशयास्पद आहे. काहीतरी मिस्ट्री आहे. यासाठी बिहार आणि मुंबई पोलिसांची जबाबदार ठरते की, यावर समाधानकारक उत्तर शोधले पाहिजे. समाधानकारक उत्तराचा अर्थ आहे की, निष्पक्ष तपास, निष्पक्ष चौकशी. जर या केसमध्ये काही गडबड असेल तर कुणीही काहीही पचवू शकणार नाही. कारण देशातील सव्वाशे कोटी जनता जे काही होत आहे ते पहात आहे. बिहार आणि मुंबई पोलिसांनी मिळून सत्याच्या मुळापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर मुंबई पोलिसांनी सहकार्य केले तर आम्ही शेवटच्या टप्प्यावर नक्की पोहचू.

डीजीपी गुप्तेश्वर पांडे म्हणाले, 25 जुलै 2020ला पाटणामध्ये केस दाखल करण्यात आली. बिहार पोलिसांची टीम 27 जुलैला मुंबईसाठी रवाना झाली होती आणि टीमने त्याच दिवशी तपास सुरू केला होता. बिहार पोलिसांची टीम 28 जुलैला डीसीपी बांद्रा यांना भेटली, परंतु त्यांनी सल्ला दिला की, डीसीपी डिटेक्शनला भेटा.

29 जुलैला जेव्हा टीम डीसीपी डिटेक्शनला भेटण्यासाठी गेली तेव्हा भेट झाली नाही. पुन्हा बिहार पोलीस गेले पण भेट झाली नाही. नंतर बिहारच्या सीनियर एसपीने आपल्या समकक्ष अधिकार्‍याशी चर्चा केली. त्यानंतर मुंबई पोलीसांशी औपचारिक चर्चा झाली. मुंबई पोलिसांनी सहकार्याचे आश्वासन देखील दिले. परंतु, आम्हाला अजूनपर्यंत काहीही मिळालेले नाही. कोणताही रिपोर्ट मिळाला नाही. सीसीटीव्ही फुटेजही मिळाले नाही. यामध्ये तोंड लपवण्याची काय गरज आहे.

डीजीपी गुप्तेश्वर पांडे म्हणाले, हे प्रकरण मुंबई पोलीस विरूद्ध बिहार पोलीस असे करू नका. आम्हाला सुशांत सिंह प्रकरणात न्याय हवाय. रिया चक्रवर्ती बाबत विचारले असता ते म्हणाले, ती सापडली असती तर काही प्रश्नच नव्हता. रिया चक्रवर्ती ट्विट करते की, सीबीआय चौकशी व्हावी, पण बिहार पोलीस जातात तेव्हा तर ती लपून बसते. हा लपाछपीचा खेळ कशासाठी? जर कुणी एखादी व्यक्ती निर्दोष आहे तर तिच्यात नैतिक धैर्य असले पाहिजे आणि तिने समोर आले पाहिजे. इमोशनल व्हिडिओ बनवणे आणि सत्यमेव जयते बोलण्याने काहीही होत नाही.

रिया चक्रवर्ती बेपत्ता असण्याच्या प्रश्नावर बिहार डीजीपी म्हणाले, आमचे काही प्रश्न आहेत, जे आम्ही वकीलाशी शेयर करू शकत नाही. यामध्ये वकीलाची गरज काय आहे. आमचे जे काही प्रश्न आहेत, त्याची उत्तरे रियाने दिली पाहिजेत. लपण्याची गरज नाही.