Lockdown : 17 मे नंतर ‘लॉकडाउन’ वाढण्याचे मुख्यमंत्र्याचे ‘संकेत’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर सुरुच असून विरोधी पक्षे तसेच इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेत आता मे अखेपर्यंत काळजी घेऊन विषाणूचा प्रादुर्भाव वाढू द्यायचा नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात आणखी लॉकडाउन लांबण्याचे सूतोवाच केले आहेत. एकजुटीतून आपण हे संकट दूर करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्परन्सद्वारे घेतली. कोरोनाविरोधी लढ्यात आम्ही राज्य सरकारसोबत आहोत असे सांगत मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या निमित्ताने सर्वाना विश्वासात घेतल्याबद्दल विरोधी पक्षांच्या नेत्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच ज्या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही त्यांना पीककर्ज मिळावे म्हणून रिर्झव्ह बँकेशी बोलणे सुरू आहे. बियाणे व खरीप हंगाम व्यवस्थित मार्गी लावावा म्हणून चांगले नियोजन केले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

उपनगरी रेल्वेसेवा काही प्रमाणात तरी सुरू करावी, अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केली. तर रिक्षा, हातगाड्या घेतलेल्यांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. ते पुनर्गठित करावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. परप्रांतीय कामगार-छोटे व्यावसायिक परत गेल्याने ज्या रोजगार संधी निर्माण झाल्या आहेत त्याची माहिती सरकारने महाराष्ट्रातील बेरोजगारांना द्यावी.

त्यातून राज्यातील लोकांना रोजगार मिळू शके ल, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली. आता परत आपल्या राज्यात जाणार्‍या श्रमिक आणि कामगारांची स्थलांतरित कायद्यान्वये नोंदणी करावी. ते परत येतील तेव्हा त्यांची तपासणी केल्याशिवाय त्यांना परत घेऊ नये, अशी मागणीही राज ठाकरे यांनी केली. त्याचबरोबर टाळेबंदी करताना आगाऊ सूचना दिली पाहिजे.