उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकेरी उल्लेख…धरणग्रस्त शेतकर्‍यांचे आंदोलन

पोलिसनामा ऑनलाईन, पुणे, 31 ऑगस्ट : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकेरी उल्लेख करत खेड तालुक्यात या धरणग्रस्त शेतकर्‍यांनी आंदोलन केले. यावेळी पोलिसांची धरपकड सुरू केली. यावेळी एका शेतकर्‍याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. तर, एक शेतकरी वाहनातून पडून गंभीर जखमी झाला आहे.

पुण्याला पाणी पुरवठा करणार्‍या भामा आसखेड जलवाहिनीचे काम बंद करावे, या मागणीसाठी सोमवारी खेड तालुक्यात या धरणग्रस्त शेतकर्‍यांनी जलवाहिनीवर बसून जेलभरो आंदोलन केले. यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक झाले होते. आंदोलक शेतकर्‍यांची पोलिसांनी धरपकड केली. आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची दमछाक झाली. यावेळी एका शेतकर्‍याने तर थेट अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनचा प्रयत्न केला. तर, पोलिसांनी पोलिस वाहनात नेताना वाहनातून पडल्याने एक शेतकरी गंभीर जखमी झाला.

गेल्या 30 वर्षांपासून सुरू असलेली भामा-आसखेड धरणग्रस्तांची परवड अद्याप थांबलेली नाही आहे. जमिनीच्या बदल्यात जमीन द्या, असा न्यायालयाचा निर्णय असताना सरकार आणि अधिकारी आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही आंदोलक शेतकर्‍यांनी केलाय.

पालकमंत्र्यांसोबत गुरुवारी झालेल्या बैठकीत तोडगा नाही. त्यामुळे अखेर सोमवारी भामा-आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक झाले. जलवाहिनीची सुरू असलेले काम बंद करावे. त्यानंतरच शेतकर्‍यांबरोबर बैठक करावी, असा सूर लावला. भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांनी पुणे जलवाहिनीचे काम आजही काही वेळ बंद पाडले आहे.

आम्हाला अटक करा, नाहीतर काम बंद करा, अशी ठाम भूमिका प्रकल्पग्रस्तांनी मांडली होती. परंतु आम्हाला काम बंद करण्याचा अधिकार नसल्याने आम्ही काम बंद करू शकत नाही, अशी भूमिका चाकण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रकाश धस यांनी घेतली. त्यामुळे आंदोलक ठाण मांडून बसलेत. अखेर चिडलेल्या आंदोलकांनी प्रशासन सरकार विरोधात भूमिका घेऊन घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड करायला सुरुवात केली. यावेळी पोलिसांची दमछाक झाली.

पुण्यातील जिल्हाधिकारी यांच्या समवेत काही प्रमुख शेतकर्‍यांची बैठक झाली. परंतु या झालेल्या बैठकीमध्ये काही समाधानकारक तोडगा निघाला नाही. काम बंद करण्याची सूचना मिळाली नाही, त्यामुळे निराश झालेल्या शेतकर्‍यांनी काम बंद करण्याची मागणी केली आणि सोमवारी पुन्हा जलवाहिनी काम सुरू असणार्‍या ठिकाणी ठिय्या मांडला.

यावेळी सत्यवान नवले, देवीदास शिवेंकर, रोहिदास गडदे, ज्योती कुदळे, गजानन कुडेकर, आण्णा देवाडे, स्वप्निल येवले, संतोष कावडे, गजानन कुडेकर, किसन नवले, गणेश जाधव, तुकाराम नवले, संदीप होले, शांताराम शिवेंकर, नवनाथ शिवेंकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.