मुंबईतीली पर्य़टकांवर कर्नाटकमध्ये काळाचा घाला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दिवाळीच्या सुट्टीमध्ये कर्नाटकमध्ये फिरावयास गेलेल्या मुंबईतील पर्यटकांवर शनिवारी काळाने घाला घातला. हुबळी-धारवाड रस्त्यावर शनिवारी (दि.१८) सकाळी खासगी बस आणि ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला, तर दहा प्रवासी जखमी झाले. मृतांमध्ये घाटकोपरच्या असल्फा व्हिलेजमधील चार जण तर, भांडुपच्या दोन रहिवाशांचा समावेश आहे.
या भीषण अपघातामध्ये बसमधील सहा प्रवासी जागीच ठार झाले. सुमेधा जामसांडेकर (५८), लहू केळुस्कर (६५), रमेश जैतपाल (६५), दिनकर म्हात्रे (७५), विश्वनाथ म्हात्रे, सुचित्रा राऊळ अशी मृतांची नावे असून, जखमींवर हुबळी येथील किम्स आणि लाइफलाइन रुग्णालयांत उपचार करण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या ललना केळुस्कर यांना मुंबईत आणण्यात आले आहे.
घाटकोपरचे असल्फा व्हिलेजमध्ये राहणारे म्हात्रे कुटुंबीय दरवर्षी दिवाळी संपल्यानंतर मित्र, नातेवाईक यांच्यासह फिरायला जातात. यंदा भाऊबीज आटोपल्यानंतर सुमारे ४० जणांचा ग्रूप कनार्टकमध्ये फिरण्यासाठी गेले. शनिवारी त्यांच्या पर्यटनाचा अखेरचा दिवस होता. एका पर्यटनस्थळी जाण्यासाठी सर्व जण पहाटे काथ्यायिनी ट्रॅव्हल्सच्या खासगी बसने हॉटेलमधून निघाले. सकाळी पावणेसहाच्या सुमारास हुबळी-धारवाड रस्त्यावरून जात असताना अनिंगेरी गावाजवळ रस्त्याकडेला एक टेम्पो उभा होता. बसचालकाने वेगावर नियंत्रण न मिळवता तसेच समोरून येणाऱ्या वाहनांकडे लक्ष न देता टेम्पोच्या बाजूने बस काढण्याचा प्रयत्न केला. याचवेळी समोरून
येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. दोन्ही वाहने वेगात असल्याने या धडकेत बस कलंडली आणि रस्त्याबाहेर फेकली गेली.
शहापुरात चौघांना चिरडले
शहापूर : मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या इनोव्हा कारचालकाने शहापूरजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या चार जणांना चिरडले. सकाळी सातच्या दरम्यान नाशिक महामार्गावरील कांबारे फाट्याजवळ झालेल्या या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर कार चालक मात्र फरार झाला आहे. अपघातात शहापूर तालुक्यातील श्रीराम पाटोळे (४५, शेंद्रुण), दौलत दवणे (३६, सावरोली), आदित्य नवगिरे (१६, डोळखांब), अब्दुल गनिफ शेख (५५, किन्हवली) अशी मृतांची नावे आहेत.