..तर प्रशासनाने लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय घ्यावा : मुख्यमंत्र्यांचे आदेश

पोलिसनामा ऑनलाईन टीम – ठाणे आणि अन्य महापालिकांच्या क्षेत्रात पुन्हा सरसकट लॉकडाउन नको, अशी भूमिका स्थानिक नेते-नागरिक घेत असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाबाबत स्थानिक प्रशासनाची पाठराखण केली आहे. लॉकडाउनमुळे कोरोना नियंत्रणात येईल, अशी खात्री असेल तर विश्वासाने निर्णय घ्या, कुणाच्याही दडपणाखाली येऊ नका, अशा शब्दांत गरजेनुसार पुन्हा लॉकडाउन करण्यास मुख्यमंत्र्यांनी सूचक होकार दर्शवला आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील आणि राज्यातील अनेक भागांत जाहीर केलेल्या स्थानिक लॉकडाउनची मुदत एक-दोन दिवसांत संपत आहे. त्यामुळे पुन्हा सरसकट लॉकडाउन नको, रुग्ण सापडणार्‍या प्रतिबंधित क्षेत्रातच लॉकडाउन लागू करावी, अशी भूमिका नागरिकांबरोबरच आता राजकीय पक्षही घेऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, आयुक्तांशी दूरचित्रसंवादाद्वारे संवाद साधला. आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आदी या वेळी उपस्थित होते.

शहरी भागातील कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका, असा स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. सरकारने 130 पर्यंत चाचणी केंद्रे वाढवली आहेत. धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांवरील बंदी कायम ठेवली आहे. सणवार साजरे करताना नवे प्रतिबंधित क्षेत्र वाढू नये. काही दिवसांपूर्वी धारावीच्या प्रारूपाचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले. मुंबईने अत्यंत पारदर्शक पद्धतीने काम केले आहे. कुठलीही माहिती लपविली नाही. हे संकट किती भीषण आहे आणि त्याला राज्य सरकारने कसे तोंड दिले हेही आपण नागरिकांना विश्वासात घेऊन मोकळेपणाने सांगितले आहे. धारावीचे प्रारूप राबवून राज्यात इतरत्रही संसर्ग नियंत्रणात आणता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.