…तर आम्ही निर्णय घेण्यास मोकळे आहोत : अशोक चव्हाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस पक्ष फरफटत जाऊ नये यासाठी ज्येष्ठ नेते मंत्रिमंडळात असावेत. कॉमन मिनिमम प्रोग्रॅमची चौकट पाळणे गरजेचे आहे. जेव्हा आम्हाला वाटेल की चौकटीच्या बाहेर चाललेय तेव्हा आम्ही निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत, असा सूचक इशारा अशोक चव्हाणांनी शिवसेनेला दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

राज्यात गेल्या काही दिवसांच्या नाट्यमय घटनेनंतर अखेर शिवसेना , काँग्रेस , राष्ट्रवादी यांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या सत्तावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. मंत्रीपद निश्चित करण्यात काँग्रेससमोर पेच असून अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांना कोणतं मंत्रीपदं द्यायचा याविषयी काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याविषयी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले  की , ‘अनेक नेते पक्षात आहेत, जे चांगले काम करतात. ते निर्णय घेतात आणि आम्ही त्यामागे फरफटत चाललोय असे व्हायला नको. आमचीही मते आहेत, निर्णय प्रक्रीयेत आमचाही आवाज महत्वाचा आहे. खातेवाटपाचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे. तिन्ही पक्षांना वाटत आहे की एक विभाग त्यांच्याकडेच असावा. यावरून चर्चा सुरू आहे. अशोक चव्हाण किंवा पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रीमंडळात घ्यावे की नाही हा विषय नाहीय. काँग्रेस पक्ष फरफटत जाऊ नये यासाठी ज्येष्ठ नेते असावेत. कॉमन मिनिमम प्रोग्रॅमची चौकट पाळणे गरजेचे आहे. जेव्हा आम्हाला वाटेल की चौकटीच्या बाहेर चाललेय तेव्हा आम्ही निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत. ‘

पक्षाची फरफट होऊ नये यामुळे तेवढी काळजी पक्षाच्या नेतृत्वाला घ्यावी लागेल. यामुळे तिन्ही पक्षांमध्ये संतुलन बनेल. पक्ष म्हणून जी जबाबदारी आहे ती नीट पार पाडली गेली पाहिजे, यामुळे जुने नवे अशी फळी नीट सांधली गेली पाहिजे असा संदेश त्यांनी स्वपक्षालाही दिला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर  शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या एकूण 6 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र अजूनही महाविकास आघाडीचं खातेवाटप करण्यात आलेलं नाही.
Visit : Policenama.com