मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – निवडणुक प्रचारादरम्यान शिवसेनेने दिलेल्या आश्वासनानुसार सत्तेत आल्यांनतर शिवभोजन थाळीला सुरुवात केली. १० रुपयांत सामान्य लोकांच्या खिशाला परवडणाऱ्या या थाळीत पोटभर जेवण दिले जाते. शिवसेनेच्या या प्रकल्पनंतर आता भाजपनेदेखील दीनदयाळ थाळी सुरू केली आहे. पंढरपुरातून या थाळीला सुरुवात केली असून अवघ्या ३० रुपयांत ही थाळी दिली जात आहे.
पंढपुरातील काही महिलांनी श्री महिला उद्योग या संस्थेची स्थापना केली होती. ज्याद्वारे महिलांनी शेंगदाणा लाडू, पापड आणि इतर खाद्यपदार्थ बनवून विकण्यास सुरुवात केली होती. त्यांनतर भाजपने या महिलांनासोबत घेऊन दीनदयाळ थाळी सुरू केली आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचं औचित्य साधून राज्याचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते या थाळीची सुरुवात झाली.
भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांच्या पुढाकाराने ही थाळी सुरू करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिरापासून ५ मिनिटांच्या अंतरावर इंदिरा गांधी भाजी मार्केट जवळ या योजनेस आजपासून शुभारंभ झाला. ३० रुपयांच्या या दीनदयाळ थाळीत ३ चपाती, १ वाटी भाजी, १ वाटी आमटी, १ भाताची मुद , १ वाटी ताक, लिंबू फोड, शेंग चटणी, लोणचे, पापड असे १० पदार्थ देण्यात येत आहेत. दुपारी १२ ते १ या एक तासाच्या वेळेतच ही थाळी सर्वांना दिली जात आहे. विशेष म्हणजे पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारे भाविक या थाळीचा लाभ घेत असून तासाभरात सुमारे ५०० भाविक या थाळीचा लाभ घेऊ शकतील, असं भाजपने सांगितलं.
या संस्थेतील महिला थाळीसाठी लागणारे सर्व सामान स्वतः बाजारातून आणतात. दरम्यान, पंढरपुरात दररोज २५ ते ३० हजार भाविक दर्शनसाठी येत असतात. त्यामुळे भाविकांचा आणि ग्राहकांचा विचार करता जेवणाच्या वेळेत वाढ करण्यात येणार असल्याचे समजते. तसेच पंढपूरसह इतर ठिकाणीही या योजनेचा विस्तार करणार असल्याचं म्हंटल जात आहे.