कोरोना : राज्यात सोलापूरचा मृत्यूदर सर्वाधिक

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधितांची संख्या मुंबईत सर्वाधिक असली तरी, सर्वात जास्त मृत्यूदर सोलापूरमध्ये आहे. सोलापूरचा मृत्यूदर 7.97 टक्के इतका आहे, तर मुंबईचा 5.6 टक्के आहे. 6 हजार 355 रुग्णसंख्या असलेल्या जळगावचा मृत्यूदरही मुंबईइतकाच असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

सोलापूरमध्ये आतापर्यंत 3 हजार 514 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी 318 मृत्यू आहेत. सोलापूर ग्रामीण भागात 954 रुग्णांमागे 39 मृत्यू नोंदविले गेले. जळगावमध्ये मात्र उलट चित्र असून ग्रामीणमध्ये 4 हजार 789 रुग्णांमागे 298 मृत्यू, तर महानगरपालिकेत 1 हजार 566 रुग्णांमागे 63 मृत्यू आहेत. राज्यात सोलापूर, मुंबई, जळगाव त्याखाली लातूर (4.88 टक्के), धुळे (4.84 टक्के), जालना (4.33 टक्के) असा मृत्यूदर आहे. मुंबईतील एकूण रुग्णसंख्येने 95 हजारांचा टप्पा पार केला आहे. मृत्यूदरात मात्र गेल्या पंधरा दिवसांत घट झाली असून 5.8 टक्क्यांवरून 5.6 वर आला आहे.

भिवंडी महानगरपालिकेचा मृत्यूदर मुंबईपेक्षा अधिक म्हणजे 6 टक्के आहे. त्याखालोखाल ठाणे (3.87 टक्के), नवी मुंबई (2.67 टक्के) आणि ठाणे ग्रामीणमध्ये (2 टक्के) मृत्यूदर आहे. मुंबई वगळता राज्यात इतर जिल्ह्यांमध्ये संसर्ग प्रसार झपाट्याने वाढत आहे. गेल्या 15 दिवसांत रुग्णसंख्या जवळपास दुप्पट झालेल्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, पुणे, पालघर, रायगड, सांगली, सोलापूर, अहमदनगर, जळगाव, जालना, बीड, लातूर, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीचा समावेश आहे. कोरोनाची भीती असल्याने रुग्ण लक्षणे असूनही उपचारासाठी लवकर येत नाहीत.लक्षणे तीव्र झाल्यानंतरच रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. तोपर्यत रुग्णांची प्रकृती अधिक गंभीर होते. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रात तपासणी, चाचण्यांवर भर देत रुग्णांचे वेळेत निदान करण्यावर भर देण्यात येत आहे.