पाकिस्तानकडून गोळीबार, २४ वर्षीय भारतीय जवान शहीद

श्रीनगर : पोलीसनामा ऑनलाईन – काही केले तरी पाकिस्तानच्या नापाक कुरापती थांबत नाहीत. आज पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात यश पाल या भारतीय जवानाला वीरमरण आले आहे. त्यांचे वय अवघे २४ वर्ष होते. राजौरी जिल्ह्यातील शेलिंग फॉरवर्ड भागात पाकिस्तानकडून हे शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. या घटनेत पाकिस्तानकडून मॉर्टर बॉम्बचा वापर करण्यात आला. शिवाय गोळीबारही करण्यात आला. यावर भारतीय जवानांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे.

पाकिस्तान आर्मीकडून सुंदरबनी सेक्टरमधील केरीमध्ये सकाळी शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. यातच रायफलमॅन यशपाल याला वीरमरण आले. यशपाल हा जम्मू काश्मीरमधील उधमपूरचा रहिवासी असून शोक व्यक्त केला जात आहे. पाकच्या कुरापतींमुळे अवघ्या २४ वर्षीय भारतीय जवानाला आपला जीव गमवावा लागला आहे.

दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सैन्याकडून दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याची मोहिम काश्मिरमध्ये सुरु आहे. परंतू दुसरीकडे पाकिस्तान सैन्याकडून वारंवार जवानांवर गोळीबार केला जात आहे. त्यात अनेक जवानांना वीरमरण आले. जानेवारीपासून आतापर्यंत पाकिस्तानने 110 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.