मुंबईसह किनारपट्टी परिसरात 26/11 सारख्या हल्ल्याची शक्यता, राजनाथ सिंहांनी दिला ‘अलर्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पाकिस्तानमधील काही दहशतवादी संघटना मुंबईत पुन्हा एकदा 26/11 सारखा समुद्री मार्गे हल्ला करण्याची शक्यता आहे. भारतात मोठा घातपात घडवून आणण्यासाठी दहशतवादी समुद्रमार्गे मुंबई तसचे अन्य किनारपट्टी भागात हल्ला करू शकतात. अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी गुप्तचर यंत्रणेच्या हवाल्याने दिली आहे. मात्र अशा प्रकारच्या योजनेत दहशतवादी कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीत. भारताचे नौदल दहशतवादी हल्ले रोखण्यास सक्षम असल्याचे सिंग यांनी सांगितले. संपूर्ण भारतीय बनावटीची INS खंदेरी या पाणबुडीचे सिंह यांच्या हस्ते जलावरण करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते.

राजनाथ सिंह म्हणाले की, भारताला वारंवार युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानने हे समजून घेणे गरजेचे आहे की INS खंदेरी शत्रूचा नायनाट करू शकते. 1971च्या युद्धात देखील नौदलाने स्वत:ची ताकद दाखवली होती. जागतीक व्यासपीठावर काश्मीर आणि भारतासंदर्भात चुकीचे गैरसमज पसरवणारे पाकिस्तान उघडे पडले आहे. काश्मीरमधील परिस्थिती सामान्य आहे आणि आमच्या नियंत्रणात आहे. पाकिस्तान दहशतवादी संघटनांना मदत करते हे जगाला समजले आहे.’

INS खंदेरी ही अत्याधुनिक पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात शनिवारी समाविष्ट करण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते जलावतरणाचा कार्यक्रम पार पडला.

कलवरी श्रेणीतील INS खंदेरी दुसरी पाणबुडी असून डिझेल-विद्युत प्रकारातील सर्वात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये करण्यात आला आहे. कलवरी श्रेणीतील सहा पाणबुडय़ा बांधण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत ही दुसरी पाणबुडी नौदलात दाखल झाली आहे. या पाणबुडीची बांधणी माझगाव डॉकने केली आहे. सध्या नौदलाकडील पाणबुडींची संख्या मर्यादित असून खंदेरीमुळे नौदलाच्या ताकदीत वाढ होणार आहे.

Visit : Policenama.com