आता बँकेच्या ATM मध्ये सदैव कॅश उपलब्ध, नाहीतर होणार बँकेला दंड ; जाणून घ्या काय ‘हा’ प्रकार

पोलिसनामा ऑनलाईन टीम : सर्वसामान्य नागरिकांसाठी एक सुखद निर्णय घेण्याच्या तयारीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) सध्या आहे. बऱ्याचवेळा एटीएम मशीनमध्ये पैसे नसल्यमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र आता एखाद्या एटीएममध्ये ३ तासांपेक्षा अधिक काळ कॅश उपलब्ध नसेल तर संबंधित बँकांना दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे बँकांना अत्यंत काटेकोरपणे एटीएम सुविधा पुरवावी लागणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार RBI ने सर्व बँकांना तसे परिपत्रकदेखिल पाठवले आहे. याची अधिकृत घोषणादेखील लवकरच होईल.

अनेक ठिकाणी बँकांच्या एटीएममध्ये पैसेच नसतात. ग्रामीण तसेच शहरी भागात देखील हि समस्या आहे. ग्रामीण भागात तर अनेक दिवस एटीएम मशीन पैशांशिवाय असतात तरीदेखील बँका याकडे दुर्लक्ष करतात. नागरिकांची यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. आता मात्र असे करणे बँकांना महागात पडणात असून ३ तासांपेक्षा अधिक काळ एटीएम मशीन पैशांशिवाय राहू देता येणार नाही. या कालावधीत बँकांनी मशीनमध्ये पैशांचा भरणा न केल्यास अशा बँकांना दंड ठोठावला जाणार आहे.

बँकांना कशी कळते ATM मधील कॅश ची माहिती :

प्रत्येक एटीएम मशीनमध्ये सेन्सर बसविलेला असतो. या सेन्सरच्या माध्यमातून मशीनमध्ये किती पैसे शिल्लक आहेत आणि कधी पैसे संपतील याची नेमकी माहिती बँकांना मिळत असते. यावरून किती वेळात पैशांचा भरणा करावा लागेल याचा अचूक अंदाज बँका बांधू शकतात. असे असूनदेखील बँक मात्र याकडे दुर्लक्ष करत होत्या. आता मात्र बँकांना एटीएमची सुविधा अधिक काटेकोरपणे पुरविणे अनिवार्य होणार आहे.