Kerala Monsoon Update : केरळमध्ये मान्सून दाखल, राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये ‘यलो’ अलर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. हवामान खात्यानुसार, दक्षिण-पश्चिमम मान्सून केरळमध्ये पोहोचला आहे. आयएमडीचे उपमहासंचालक आनंद कुमार शर्मा सोमवारी म्हणाले की, आज केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले. कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे ३-४ तारखे दरम्यान दादरा नगर हवेली, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, दमण दीव येथे मुसळधार पाऊस पडेल. येथील लोकांना अधिक सावध राहावे लागेल. केरळमध्ये झालेल्या मुसळधार पावसादरम्यान भारतीय हवामान खात्याने राज्यातील ९ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने केरळमधील तिरुअनंतपुरम, कोल्लम, पठाणमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, मलप्पुरम आणि कन्नूर जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे.

केरळमध्ये बर्‍याच भागात मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे तापमानात लक्षणीय घट नोंदली गेली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, तिरुअनंतपुरममध्ये दिवसाचे तापमान २५ अंशांपर्यंत गेले आहे. केरळच्या दक्षिण किनारी भागात आणि लक्षद्वीपमध्ये गेल्या चार दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. हवामान खात्याने शनिवारी हा मान्सूनपूर्वीचा पाऊस असल्याचे म्हटले होते. तर हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटने असा दावा केला होता की, दक्षिण-पश्चिम मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल झाला आहे. मात्र, भारतीय हवामान खात्याने स्कायमेटचा हा दावा नाकारत म्हटले होते की, सध्या परिस्थिती अशी घोषणा करण्याच्या अनुकूल नाही.

भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी रविवारी सांगितले होते की, मान्सून अद्याप केरळमध्ये पोहोचलेला नाही, आम्ही यावर नियमितपणे लक्ष ठेवून आहोत. १ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. यापूर्वी भारतीय हवामान खात्याने आपल्या अंदाजात म्हटले होते की, केरळमध्ये यंदा मान्सून उशिरा दाखल होईल. हवामान खात्याने म्हटले होते की, केरळमध्ये यावर्षी मान्सून ५ जूनपर्यंत येऊ शकतो.

सर्वात पहिले केरळमध्ये दाखल होतो मान्सून
भारतात दक्षिण-पश्चिम मान्सून दरवर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान ४ महिने असतो. साधारणत: तो सर्वात पहिले केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर तो देशात वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचतो. मागील वर्षी अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सून त्याच्या निश्चित तारखेच्या दोन दिवस अगोदर १८ मे रोजी दाखल झाला होता, परंतु गती कमी झाल्यामुळे केरळमध्ये तो उशीरा पोहोचला होता, तर संपूर्ण देशात १९ जुलै रोजी पावसाळा सुरू झाला होता. विभागाच्या म्हणण्यानुसार यंदा मान्सून सामान्य राहील.