जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरचा मृत्यू ?

इस्लामाबाद : वृत्तसंस्था- जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरचा याचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. मसूद अझहरचा शनिवारी (दि.२) मृत्यू झाल्याचे वृत्त आहे मात्र त्याला दुजोरा मिळालेला नाही. पाकिस्तानातील इस्लामाबाद इथं त्याचा मृत्यू झाला असल्याची चर्चा आहे. कर्करोगाने त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे. परंतु पाकिस्तानकडून या बातमीला अद्याप दुजोरा मिळाला नाही.

संपूर्ण देशाला हादरवून टाकणारा दहशतवादी हल्ला पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे झाला. या हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी बंदी घालण्यात आलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली. संघटनेने जारी केलेल्या एका व्हिडीओनुसार आदिल अहमद उर्फ वकास कमांडोने हा हल्ला घडवून आणल्याचे समोर आले आहे.

सीआरपीएफच्या ताफ्यातील गाड्या आयईडीने उड़वून देणाऱ्या या संघटनेचा हा पहिलाच हल्ला नाही. 1999 च्या कंदहार विमान अपहरणापासून जैशने आपल्या कारवायांना सुरुवात केली. 1994 ला काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या हरकत-उल-मुजाहिद्दीन चा सदस्य   असल्याच्या कारणावरुन अजहर मसूदला अटक केली होती. त्याला सोडवण्यासाठी विमानाचं अपहरण करण्यात आलं होतं.मसुदच्या मृत्यू बाबत अद्याप दुजोरा मिळालेला नाही. भारताने केलेल्या हल्ल्यातच त्याचा मृत्यू झाला असावा मात्र पाकिस्तान ते लपवत आहे असे देखील बोलेले जात आहे.

कोण आहे मसूद अजहर –
मसूद अजहर हा जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात मसूद अजहर हा जैश-ए-मोहम्मदच हात होता. भारताविरुद्ध कारवाया करणे आणि पाकिस्तानमधील तरुणांची माथी भडकाविण्याचे काम मसूद अजहर गेल्या काही वर्षांपासून करीत आहे. मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत मसूद अजहरचं नाव पहिलं आहे. मसूद अजहरचे शिक्षण कराची येथील जमिया उलूम अल इस्लामिया येथे झाले. त्यानंतर तो हरकत-उल अंसार या संघटनेत सामील झाला. त्याला पहिल्यांदा १९९४ मध्ये त्याला दहशतवादी कारवाया प्रकरणी श्रीनगरमध्ये अटक केली होती.

जैश-ए-मोहम्मदची स्थापना –
नेपाळची राजधानी काठमांडू येथून दिल्ली येथे जात असलेल्या विमानाचे दहशतवाद्यांनी २४ डिसेंबर, १९९९ रोजी अपहरण केले होते. त्यात १८० प्रवाशी होते. या प्रवाशांच्या मुक्ततेसाठी अटल बिहारी वाजपेयी सरकारने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मसूद अजहरसह तीन दहशतवाद्यांची सुटका केली होती. सुटकेनंतर त्याने पाकिस्तानमधील कराचीत ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेची स्थापना १९९९ मध्ये केली होती.

संसदेवर हल्ला –
जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेच्या स्थापनेच्या वर्षभरातच २००१ मध्ये संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना १३ डिसेंबरला लष्कर- ए- तैय्यबा आणि जैश- ए- मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ५ दहशतवाद्यांसह १४ जणांचा मृत्यू झाला आणि १८ जखमी झाले. भारतीय संसदेवरील हल्ल्यानंतर अजहरला पाकिस्तानमध्ये अटक केली होती. पण कुठलाही पुरावा नसल्याच्या कारणावरून लाहोर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २००२ मध्ये त्याची सुटका करण्यात आली.