राज्यातील 10 वी, 12 वी च्या परीक्षांसंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी मांडली भूमिका !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मागील महिन्यात राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, बारावीच्या परीक्षा घेतल्या जातील असे सांगण्यात आले. सीबीएसई बोर्डाने देखील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु, मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने राज्य सरकारच्या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत नेमकं काय होणार ? या संदर्भात पालक आणि विद्यार्थी संभ्रमात असताना शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली.

मुख्यमंत्र्यांशी बोलून 2 दिवसांत निर्णय

उच्च न्यायालयाने उपस्थित केलेले प्रश्न आणि केंद्र सरकारची परीक्षांबाबतची भूमिका या एकूणच विषयांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोन दिवसांत चर्चा होणार आहे. यावेळी परीक्षांच्या मुद्यावर सविस्तर विश्लेषण होईल, अशी माहिती गायकवाड यांनी दिली. सोमवारी मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ दिल्याचं देखील वर्षा गायकवाड यांनी नमूद केलं. यामुळे येत्या काही दिवसांत दोन्ही परीक्षांबाबत चित्र स्पष्ट होईल, अशी शक्यता आहे.

विद्यार्थ्यांचे हित महत्त्वाचं

यावेळी बोलताना वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या हिताला राज्य सरकार प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, सर्वांना माहित आहे की तिसऱ्या लाटेची आपण सध्या चर्चा करत आहोत. त्याचा सर्वाधिक परिणाम मुलांवर होण्याची शक्यता आहे. कुटुंबात कोरोना पॉझिटिव्ह असेल, तर तिथल्या विद्यार्थ्यांची मानसिकता काय असेल हे समजून घेतली पाहिजे. मुलं वर्षभरापासून या परीक्षेसाठी तयारी करत आहेत. विद्यार्थ्यांचं हित, त्यांचं शारिरीक आणि मानसिक आरोग्य बघूनच परीक्षासंदर्भात निर्णय घेतला जाईल. विद्यार्थ्यांमध्ये देखील संभ्रम आणि घबराटीचं वातावरण असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

उच्च न्यायालयासमोर आमची बाजू मांडणार

राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यासंदर्भात बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, उच्च न्यायालयाला आम्ही आमचं म्हणणं सांगू. ही असाधारण परिस्थिती आहे. दुसरी लाट कमी असेल असे वाटत होते. पण कोरोनाची वाढ झाली. दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत मुलांवर याचा परिणाम होऊ लागला आहे. आम्ही न्यायालयासमोर आमचं म्हणणं मांडू. न्यायालय यासंदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करेल, अशी मला खात्री असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.