दोन दिवसांपासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मिटवण्यात अखेर राज्य सरकारला यश आलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला होता. त्यामुळे राज्यातील प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. याच पार्श्वभूमीवर सर्व कामगार संघटना आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यात आज (शनिवार) महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्यानं एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला.

संपाच्या काळात अनेक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई मागे घेण्यात येईल, मात्र ज्यांनी गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले, त्यांच्याबाबत तडजोड केली जाणार नाही, असं दिवाकर रावतेंनी स्पष्ट केलं.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचं दोन दिवसात 33 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. एसटी संपाच्या दुसऱ्या दिवशी एसटीचा 18 कोटी रुपयांचा महसूल बुडाला, तर पहिल्या दिवशी 15 कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं.दिवसभरात महाराष्ट्रातील 250 आगारातून सुमारे 20 टक्के बसच्या फेऱ्या सुटल्या. राज्यातील 25 आगार पूर्ण क्षमतेने चालू होते. तसेच 151 आगारामध्ये अंशतः वाहतूक सुरु होती.राज्यातील 97 आगारातून दिवसभरात एकही बसची फेरी बाहेर पडली नाही. या संपाचे परिणाम मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, या जिल्ह्यात मोठया प्रमाणात जाणवत आहेत.तुलनेने मराठवाडा आणि विदर्भामध्ये 40 टक्के वाहतूक सुरु होती. संध्याकाळी चार वाजेपर्यंत होणाऱ्या 32 हजार 148 बस फेऱ्यांपैकी सहा हजार 308 फेऱ्या सुरळीत सुरु होत्या.