राज्यात मंत्रिपद तर केंद्रात कॅबिनेट मिळणार ; नाराजी सोडा, महायुतीच्या प्रचाराला लागा : रामदास आठवले
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात एका पदाधिकाऱ्याला मंत्रिपद तर केंद्रात पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे. त्यामुळे नाराजी सोडा आणि महायुतीच्या प्रचाराला लागा असे आवाहन केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
सांताक्रूझ पूर्व कालिना येथील भीमछाया सांस्कृतिक केंद्रात आयोजित राज्यकमिटीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस राजा सरवदे, काकासाहेब खंबाळकर, माजी आमदार अनिल गोंडाने, दिपकभाऊ निकाळजे, आदी उपस्थित होते.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर रिपाईची बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी आपल्या पक्षाला राज्यात एका पदाधिकाऱ्याला मंत्रिपद मिळणार आहे तसेच केंद्रात रिपब्लिकन पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे. त्यामुळे कोणताही आततायी निर्णय न घेता सर्व राज्यात भाजप, शिवसेना, आरपीआय महायुतीचा प्रचार करा. तसेच महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणीकपणे काम करण्याचा ठराव बैठकीत संमत करण्यात आला. तसेच जे कार्यकर्ते पक्षाच्या अधिकृत आदेशाविरुद्ध काम करतील त्यांना पक्षातून निलंबित करण्यात येईल असा इशारा ना रामदास आठवले यांनी आजच्या बैठकीत दिला.