नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पूर्वी पेन्शन ही फक्त सरकारी कर्मचाऱ्यांची मक्तेदारी होती. १ मे २००९ पासून नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) ही योजना सर्व भारतीय नागरिकांकरिता खुली करण्यात आली. या योजनेतील खातेदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांना आता ह्या योजनेचा अगदी सहज लाभ घेता येणार आहे. घरातील कम्प्युटरवरून अथवा स्मार्टफोनच्या साह्याने NPS चे नवे खाते सुरू करता येणार आहे.
NPS साठी लागणारे डॉक्युमेंट्स –
NPS चे नवीन खाते ऑनलाइन सुरू करण्यासाठी पॅन कार्ड, निवासी पत्त्याच्या पुराव्यासाठी वाहन परवाना, पासपोर्ट अथवा मतदार ओळखपत्र, ही कागदपत्रे छायाचित्र आणि स्वाक्षरी स्कॅन करून ठेवणे आवश्यक आहे.
असे करा ऑनलाईन खाते सुरु –
एनएसडीएल, कार्वी आणि एचडीएफसी सेक्युरिटिज या तीन वेबसाइट आहेत. यापैकी कोणत्याही एका वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन पर्यायाची निवड करून त्यावर क्लिक करा. त्यानंतर इंडिव्हिज्वल सबस्क्रायबर या शीर्षकावर क्लिक करा. यामध्ये NPS खात्याचा प्रकार निवडावा लागेल. टियर वन व टियर टू असे दोन पर्याय असतील. यातील टियर वनचा पर्याय अनिवार्य आहे. यानंतर उपलब्ध पेन्शन फंडमधील एकाची निवड करा. या निवडीसाठी आठ फंडांचे पर्याय आहेत. एका वर्षभरात केवळ एकदाच फंड मॅनेजरमध्ये बदल करता येईल.
आता ऑटो असे शीर्षक दिसेल. यामध्ये कोणत्या प्रकारची बचत करायची आहे हे ठरवता येईल. गुंतवणूकदाराने आपल्या सोयीनुसार अॅग्रेसिव्ह, मॉडरेट आणि कन्झर्व्हेटिव्ह यातील एक पर्याय निवडावा. या खात्याचे व्यवहार ज्या बँक खात्यामार्फत केले जाणार आहेत ते खाते निवडावे. मात्र या बँक खात्यास नेटबँकिंगची सुविधा घेतलेली असणे गरजेचे आहे. केवायसी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी एनपीएसच्या अर्जदाराचे नाव व पत्ता हा संबंधित बँक खात्याच्या नाव व पत्त्याशी जुळणे आवश्यक आहे.
टियर वन खाते प्रकारासाठी किमान ५०० रुपये व टियर टू प्रकारच्या खात्यासाठी किमान एक हजार रुपये भरणे अनिवार्य आहे. यानुसार नेटबँकिंगने पहिला हप्ता भरा. पुढील हप्ते डेबिट वा क्रेडिट कार्डनेही भरता येतात. भरून झालेला हा अर्ज डाऊनलोड करा व त्याची प्रिंट काढा. या प्रिंटची एक प्रत सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सीकडे ९० दिवसांत पाठवावी.
नॅशनल पेन्शन सिस्टीम –
भारत सरकारने १ जानेवारी २००४ रोजी नॅशनल पेन्शन सिस्टीम (NP) सुरू केली. प्रथमत: ही योजना शासनाने नवीन भरती झालेल्या शासकीय कर्मचार्यांकरिता (सैन्यदले वगळून) सुरू केली. परंतु १ मे २००९ पासून सर्व भारतीय नागरिकांकरिता ही ऐच्छिक योजना खुली करण्यात आली.
नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) हा बचतीसाठी चांगला पर्याय ठरत आहे. निवृत्तीनंतर सर्वोच्च परतावा, सरकारी पाठबळ व करसवलत ही या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.