आजपासून १२ वीच्या परीक्षेला सुरुवात, १५ लाख विद्यार्थी देणार परीक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आज (दि.२१) राज्यात बारावीच्या परीक्षा सुरु होणार आहेत. पहिला पेपर सकाळी ११ ते २ यावेळेत इंग्रजी विषयाचा होणार आहे. २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा होणार आहे. राज्यातील एकूण नऊ मंडळातून १४ लाखांच्या वर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

हेही वाचा – किरण गित्ते यांचा प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ वाढविण्यास केंद्राचा नकार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ मंडळांमार्फत बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी राज्यभरातून १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. यामध्ये ८ लाख ४२ हजार ९१९ विद्यार्थी तर ६ लाख ४८ हजार १५१ विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत.
कला, वाणिज्य, विज्ञान आणि किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम या सर्व विभागाचे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. राज्यात २ हजार ९५७ परीक्षा केंद्रे आहेत. यावर्षी सर्व विभागात विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉलतिकीट मिळणार आहेत. तसेच पीसीएमबी अर्थात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे.