व्यापाऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर दुकानांबाबतच्या निर्बंधांवर ठाकरे सरकारचे स्पष्टीकरण, म्हणाले…

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स तसेच इतर काही व्यवसाय बंद ठेवण्याचा सूचना केल्या असून फक्त पार्सल सुविधा देण्यास परवानगी दिली आहे. मात्र मंगळवारी सरसकट सर्वच दुकाने बंद केल्याने व्यापा-यांमध्ये सरकारच्या नियमावलीबाबत संभ्रम असून नाराजी वाढली आहे. दुकाने बंद करू नये यासाठी व्यापारी संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. त्यानंतर आता दुकानांवरील निर्बंधांबाबत स्पष्टीकरण देत वरिष्ठ आयएएस अधिकारी असीम गुप्ता यांनी एक पत्रक काढले आहे.

सार्वजनिक वाहतुकीस मान्यता असून काही अटींनुसार वाहतूक सुरू राहील. विशेष म्हणजे अत्यावश्यक सेवेच्या संदर्भात मालवाहतूक करणे तसेच दैनंदिन व्यवहारांच्या वापरामधील असणाऱ्या वस्तूंची मालवाहतूक करणे याला परवानगी असल्याचे म्हटले आहे. विमान सेवेद्वारे मालवाहतूक सुद्धा सुरू असल्याचे पत्रकात म्हटले आहे. उत्पादन निर्मिती करणाऱ्या उद्योगांनाही परवानगी दिली असून 500 पेक्षा जास्त कर्मचारी असणाऱ्या ठिकाणी संबंधित उद्योग व्यवसायाने कोव्हिड संदर्भात सर्व उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे सरकारने म्हटले आहे. शेतीच्या सर्व कामांना परवानगी असून कृषी संबंधित व्यापारी दुकाने देखील खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. खाद्यपदार्थ, कुक्कुटपालन व्यवसाय, मत्स्य व्यवसायास देखील परवानगी आहे. पायाभूत सुविधा, स्टॉक एक्सचेंज संबंधित कार्पोरेट कंपन्या, तसेच टेलिकॉम, गॅस या सुविधाही अत्यावश्यक सेवेच्या अंतर्गत येत असल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकाने दिले आहे.