बदल्यांचा घोळ अद्यापही सुरूच, पोलिसांच्या बदल्यांना ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ ?

पोलीसनामा ऑनलाईन टीम : पोलिसांच्या बदल्यांसाठी राज्य सरकारकडून पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. 7 सप्टेंबरपर्यंत ही मुदतवाढ असणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त ठेवावा लागत असल्यानं बदल्यांची मुदतवाढ ही 7 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. परंतु राज्य सरकारमधील तीनही पक्षात वाद पेटला असताना या बदल्यांना विलंब होत असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या बदल्यांवरून राज्यात बरंच राजकारण होताना दिसलं. विशेष म्हणजे यावर निर्णय घेण्यासाठी महाविकासआघाडीच्या नेत्यांची बैठकही पार पडली होती. अशीही माहिती आहे की, या बैठकीत अनेक नावांवर चर्चा झाली आहे.

दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांच्या आणि इतर बदल्यात आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोपही केला आहे. याशिवाय आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्येही गोंधळ होताना दिसत आहे. अवघ्या 2 महिन्यात सनदी अधिकाऱ्यांची दोनदा बदली करण्यात आली आहे. यातच अनुप कुमार यादव यांची अवघ्या 20 दिवसातच दुसऱ्यांदा बदली करण्यात आली आहे. अनुप कुमार यादव यांची 23 जुलै रोजी आरोग्य खात्यातून विक्रीकर विभागात बदली करण्यात आली होती.

यानंतर आता आज (शुक्रवार दि 13 ऑगस्ट रोजी) विक्रीकर विभागातून त्यांनी बदली आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिवपदी करण्यात आली आहे. 20 जून रोजी विनिता सिंघल यांची फिल्म सिटीतून आदिवासी विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली झाली होती. यानंतर अवघ्या 2 महिन्यात कामगार विभागात त्यांची बदली करण्यात आली आहे. याआधीही 10 पोलीस उपायुक्तांच्या 3 दिवसातच बदल्या रद्द करण्यात आल्या होत्या.