कोरोना काळातही राज्याची आर्थिक प्रगती समाधानकारक : नाना पटोले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या संकटामुळे देशभरातील सर्वच क्षेत्रात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक छोटे मोठे उदयोग
धंदे बंद झाल्याने आर्थिक प्रगतीचा वेग चांगलाच मंदावला आहे. पण एवढं असतानासुद्धा कृषी क्षेत्रातील कामगिरी चांगली झाली आहे. अत्यंत कठीण परिस्थीतीतसुद्धा राज्याची आर्थिक प्रगती समाधानकारक असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हणले आहे. शुक्रवारी राज्याचा २०२०-२१ आर्थिक वर्षासाठीचा पाहणी अहवाल सादर करताना ते बोलत होते.

काय म्हणाले नाना पटोले 

“कोरोना महासाथीदरम्यान केंद्राचे आर्थिक असहकार्य, आरोग्याच्या सोयीसुविधा न पुरवणे तसेच १ लाख ५६ हजार कोटींचा महसूल कमी असतानाही ३१ लाख ४ हजार शेतकऱ्यांना १९ हजार ८४७ कोटींची कर्जमाफी देण्यात आली. १० लाख लिटर दुध रोज घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला. सेवा व उत्पादन क्षेत्राला महामारीचा फटका बसला असतानाही महाराष्ट्रातील मेहनती शेतकऱ्यानी ११.७ टक्क्याचा विकास दर ठेऊन अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात उभारी दिली. तसेच एका गोष्टीचा अभिमान आहे कि संकटात संधी समजून पेट्रोल डिझेलवर कोणत्याही प्रकारचा कर लावला नाही,” असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

मजुरांना राज्यात येण्यास प्रोत्साहन दिले

“अनलॉक करत असताना उद्योग लवकरात लवकर सुरु झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करुन गावी गेलेल्या मजुरांना परत महाराष्ट्रात येण्यास प्रोत्साहित करण्यात आले. लवकरच सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात या अडचणी जरी दिसल्या तरी येणाऱ्या वित्तीय वर्षात केंद्राचे असहकार्य असतानाही महाविकास आघाडी सरकार दमदार कामगिरी करुन राज्याचा आर्थिक गाडा पूर्वपदावर आणेल असे संकतेसुद्धा नाना पटोले यांनी दिले.

मुद्रांक शुल्कात सूट

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ लक्षात घेऊन महसूल विभागाकडून मुद्रांक शुल्कात ३ टक्कयांची सवलत देण्यात आली. या सवलतीमुळे खरेदीस चालना मिळून बांधकाम क्षेत्रालाही संजीवनी मिळाली आणि राज्याच्या तिजोरीतही महसूल जमा झाला. या योजनेमुळे सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत २०१९ च्या तुलनेत दस्तनोंदणीत ४८ टक्क्यांची वाढ झाली आहे. डिसेंबर २०१९ मध्ये २ लाख ३९ हजार २९२ दस्तनोंदणीसह २ हजार ७१२ कोटींचा असलेला महसूल डिसेंबर २०२० मध्ये तब्बल ४ लाख ५९६०७ दस्त नोंदणी होऊन ४ हजार ३१४ कोटींचा महसूल मिळाला. डिसेंबरमधील दस्त नोंदणीत ९२ टक्क्यांची तर महसूलात ५९ टक्क्यांची वाढ झाली आहे. या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्राला चालना देऊन रोजगार निर्मितीचे प्रयत्न करण्यात आल्याचे नाना पाटोले यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

केंद्राकडून हक्काचे पैसे मिळाले नाही

“कोरोनाच्या संकटात सर्व व्यवहार ठप्प झाल्याने राज्याच्या महसुलावर परिणाम झाला हे उघड असतानादेखील केंद्र सरकारकडून राज्याच्या हक्काचे पैसेही देण्यात आले नाही. २०२०-२१ या आर्थिक वर्षात केंद्राकडून राज्याला ८० हजार १६४ कोटी रुपये येणे बाकी आहे. यामध्ये आदिवासी विभागाच्या योजनांसाठी मिळणाऱ्या रकमेचा समावेश करण्यात आला नाही. जीएसटीचा परतावा देखील वेळेवर दिला जात नाही अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.