‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ सोहळ्याला ‘भाजपाचे लोहपुरुष’ गैरहजर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’  जगातील सर्वाधिक उंच पुतळ्याचे अनावरण आज  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले. या सोहळ्याला भाजापाध्यक्ष अमित शहा यांसह भाजपाचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र, भाजपाचे लोहपुरुष लालकृष्ण अडवाणी यांची या कार्यक्रमाला गैरहजेरी होती. त्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

३१ ऑक्टोबर हा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तर आयर्न लेडी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आहे. त्यामुळे, राजधानी दिल्लीत आज या दोन्ही महान नेत्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह, सोनिया गांधी आणि काँग्रसच्या ज्येष्ठ नेत्यांनी इंदिरा गांधींच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनाही जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली.

दुसरीकडे सरदार पटेल यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे आज मोदींच्या हस्ते लोकार्पण झाले. मात्र, भाजपाचे ज्येष्ठ नेते या सोहळ्याला हजर नव्हते. भाजपाचे लोहपुरुष समजले जाणाऱ्या लालकृष्ण अडवाणी यांनी दिल्लीतील सरदार पटेल यांच्या पुतळ्याजवळ जाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली. तसेच इंदिरा गांधींनाही अडवाणींनी श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते असूनही अडवाणी मोदींच्या या भव्य-दिव्य सोहळ्याला का हजेरी लावली नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

सरदारांच्या पुतळ्यावरून नेत्यांमध्ये मतभेद –

देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४३व्या जयंती निमित्त त्यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या पुतळ्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गुजरातमधील साधू बेटावर करण्यात आलं आहे. पण हा पुतळा भाजपची एक राजकीय खेळी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा मोदींच्या २०१९च्या प्रचाराची सुरूवात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हा पुतळा राजकीय स्वार्थासाठी उभारल्याची टीका केली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही व्यंगचित्रातून या पुतळ्याच्या लोकार्पणावर ताशेरे ओढले आहेत. हा पुतळा उभारण्यासाठी स्थानिक परिसरातील अनेक आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने अत्यंत कमी किंमतीत विकत घेतल्याचा आरोप मेधा पाटकर यांनी केला आहे. तशा आशयाचं पत्रही त्यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलं आहे.