तरीसुद्धा गेल्या 70 वर्षांपासून ‘पाकिस्तान’ काश्मीरसाठी ‘भीक’ मागतोय, शाहिद ‘आफ्रिदी’ला गौतम ‘गंभीर’नं सुनावलं

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन –  पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात राग आवळल्याचं दिसून आले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भाजपा प्रवक्ते संबित पात्रा आणि सिनेमा निर्माते अशोक पंडीत यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत आफ्रिदी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बरेच काही बोलताना दिसत आहे. आफ्रिदीच्या या व्हिडीओस उत्तर देताना भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि भाजपा खासदार गौतम गंभीरने शाहिद आफ्रिदीला चांगलेच सुनावले असून गंभीरने आफ्रिदीची 16 वर्षाचा म्हणत खिल्ली उडवली आहे.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओच्या शाहिद आफ्रिदी प्रथम कोरोना विषाणूबाबत बोलताना दिसत आहे. मात्र, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीरबाबत बोलत आहे. या व्हिडिओत तो म्हणाला की, कोरोनापेक्षाही मोठा रोग हा मोदींच्या मनात आणि डोक्यात आहे आणि तो आजार म्हणजे धर्माचा होय. त्या आजाराच्या बळावरच ते सत्ता उपभोगत आहेत. आमच्या काश्मिरी लोकांवर मोदींनी अत्याचार करत असून याचे उत्तर त्यांना द्यावचं लागेल असं आफ्रिदी व्हिडिओत म्हणाला.

यानंतर आफ्रिदीने मोदींवर वादग्रस्त विधान करत म्हटले की नरेंद्र मोदी सर्वात डरपोक माणूस आहे. तसेच काश्मीर प्रश्नाबाबत संताप व्यक्त करत मोदींनी भारताचे सात लाख सैनिक काश्मीरमध्ये तैनात केले आहेत. इतके सैनिक तर आमच्या संपूर्ण पाकिस्तानच्या सैन्यात आहेत. परंतु त्यांना हे माहित नाही की, त्या 7 लाख सैनिकांमागे अजून 22-23 कोटी सैन्य आहे आणि आम्ही आमच्या पाकिस्तानी सैन्यासोबत आहोत असं देखील आफ्रिदीने व्हिडिओत म्हटले आहे. दरम्यान आफ्रिदीच्या या वक्तव्याचा गंभीरने जोरदारपणे समाचार घेतला आहे.

दरम्यान गंभीरने शाहिद आफ्रिदीची खिल्ली उडवली आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्यासह पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांच्यावर देखील निशाणा साधला. पाकिस्तानच्या या तिघांचा उल्लेख गौतम गंभीरने जोकर म्हणून केला. आफ्रिदीच्या विधानाला उत्तर देत गंभीरने म्हटले की पाकिस्तानकडे 7 लाख सैन्य असून 22-23 कोटी त्यांच्या सैन्याच्या पाठीशी आहेत, असं विधान 16 वर्षीय शाहिद आफ्रिदीने केलं आहे. तरीसुद्धा गेल्या 70 वर्षांपासून पाकिस्तान काश्मीरसाठी भीक मागत आहे, अशा शब्दात गंभीरने उत्तर दिले आहे. तसेच ते म्हणाले की आफ्रिदी, बाजवा आणि इमरान खानसारखे लोकं पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल विष पसरवण्याचे काम करत आहेत आणि यातूनच ते पाकिस्तानी लोकांना मूर्ख बनवत आहेत, परंतु काश्मीर तुम्हाला मिळणार नाही. बांग्लादेश लक्षात आहे ना?, असे म्हणत गौतम गंभीरने आफ्रिदीचा जोरदार समाचार घेतला.