#Anniversary SPL : वडिलांच्या ‘त्या’ अटीमुळं ‘बिग बी’ अमिताभला 24 तासाच्या आत करावं लागलं होतं जया बच्चनसोबत लग्न ! जाणून घ्या ‘रोचक’ किस्सा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार जया बच्चन आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या लव स्टोरीची खूप चर्चा झाली होती. परंतु सर्वात जास्त त्यांचं लग्न चर्चेत राहिलं. 3 जून 1973 रोजी अमिताभ आणि जया विवाहबद्ध झाले. आज त्यांच्या लग्नाला 47 वर्षे पूर्ण झाली आहेत. वडिल हरिवंश राय बच्चन यांनी एक अट घातली होती ज्यामुळं बिग बींना 24 तासाच्या आत जयासोबत लग्न करावं लागलं होतं. यामागील किस्साही खूप रोचक आहे.

बिग बींनी त्यांच्या एका ब्लॉग मधून या सगळ्याचा खुलासा केला होता. बिग बी सांगतात की, त्यांनी त्यांच्या मित्रांना शब्द दिला होता की, जर जंजीर सिनेमा हिट झाला तर ते त्यांना लंडनला फिरायला घेऊन जातील.

बिग बींनी जेव्हा पालकांना सांगितलं की, त्यांचा ग्रुप लंडनला जाणार आहे तेव्हा वडिलांनी त्यांना विचारलं कोण कोण आहे. यावेळी त्यांनी मित्रांच्या नावासोबत जयाचंही नाव घेतलं. वडिलांनी विचारलं की, जया तुमच्यासोबत येत आहे का. यावर बिग बी म्हणाले, हो.

यावेळी त्यांचे वडिल हरिवंश राय बच्चन यांनी एक अट घातली होती. ते अमिताभला म्हणाले होते की, जर तुला जयाला लंडनला सोबत घेऊन जायचं असेल तर तुला आधी तिच्यासोबत लग्न करावं लागेल. तरच तिला सोबत घेऊन जाऊ शकतो.

हेच कारण होतं की, अमिताभ यांना जयासोबत लग्न करावं लागलं होतं. बिग बी सांगतात, “मी लग्नाचा पोषाख केला आणि कारमध्ये जाऊन बसलो. मालाबार हिलवर लग्न होतं. काही तासातंच आमचं लग्न झालं. लग्नाच्या रात्रीच आम्ही लंडनला रवाना झालो.”