India-China Tension : सीमा वादादरम्यान लष्कराला 300 कोटीपर्यंत शस्त्रे खरेदी करण्याची परवानगी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लडाखमधील सीमा विवाद आणि १९६२ पासून चीनमधील सर्वात मोठ्या तणावादरम्यान सरकारने बुधवारी लष्करी दलांच्या तातडीच्या गरजा पाहता ३०० कोटी रुपयांपर्यंत शस्त्रे आणि दारूगोळा खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली.

मंत्रालयाकडून एका निवेदनात सांगितले गेले की, “यामुळे खरेदीची अंतिम मुदत कमी होईल आणि सहा महिन्यांत आदेशाची पूर्तता होईल आणि एका वर्षाच्या आत वितरण सुरू होईल.”

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिग्रहण परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. मंत्रालयाने म्हटले की, “उत्तरेकडील सीमांवर उद्भवणारी संरक्षण परिस्थिती आणि सीमेवर सशस्त्र सेना मजबूत करण्यासाठी विशेष बैठक बोलवली गेली.”

यापूर्वी २ जुलै रोजी संरक्षण अधिग्रहण परिषदेने ३८,९०० कोटी रुपयांच्या शस्त्रे आणि दारूगोळा खरेदीला मंजुरी दिली होती. यात लढाऊ विमानांच्या कमतरतेचा सामना करत असलेल्या भारतीय हवाई दलासाठी ३३ नवीन लढाऊ विमानांचा समावेश आहे.

संरक्षण अधिग्रहण परिषदेने मंजूर केलेल्या प्रस्तावांमध्ये रशियाचे २१ मिग-२९, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कडून १२ नवीन सुखोई-३० लढाऊ विमान, स्वदेश अस्त्र बीव्हीआर एअर-टू-एअर क्षेपणास्त्र, १०० किमी अंतराचे लोकल डेव्हलप लँड अटॅक क्रूझ मिसाईल (एलएसीएम) सिस्टम, स्वदेशी रॉकेट सिस्टम आणि ५९ मिग-२९ जेटचे अपग्रेडेशन समाविष्ट आहे.

२ जुलै रोजी देशांतर्गत उद्योगातून ३१,१३० कोटी रुपयांच्या लष्करी उपकरणे खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि या आदेशामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’ला बळकटी मिळेल, अशी अपेक्षा आहे.