कौतुकास्पद ! ‘आत्मनिर्भर’ विधवा मायलेकी, डोंगरावर राहून हाकतायेत ‘संसारा’चा गाडा
अकोले/अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – सरकारने गरिबांसाठी अनेक योजना आणल्या असल्यातरी त्याची अंमलबजावणी होते का हे पाहिले जात नाही. अशी अनेक कुटुंब आहेत ते सरकारच्या किंवा इतर कोणाच्याही मदती शिवाय आपला संसाराचा गाडा हाकत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील निळवडे जलाशय शेजारी विधवा माय-लेकी एका गवताच्या झोपडीत राहत आहेत. त्यांच्यापर्यंत अद्याप सरकारची कोणतीच योजना पोहोचलेली नसतानाही त्या तक्रार न करता आपला प्रपंचाचा गाडा हाकत आहेत.
निळवंडे जलाशय परिसरातील पिंपळगाव नाकविंद शिवारात गावाबाहेर असलेल्या डोंगरावर तुळसाबाई मेंगाळे आणि रखमाबाई पाथवे या दोन विधावा मायलेकी आपल्या दोन चिमुकल्यांना घेऊन गवताच्या झोपडीत रहात आहेत. अनेक वर्षापासून आपल्या अर्धवट संसाराची गाडगी-मडकी घेऊन ते प्रवास करत आहे. ऊन-वारा-पाऊस याचा सामना करत दोन-चार शेळ्या संभाळून शेताच्या एका तुकड्यावर या दोन महिला एकमेकीला साथ देत आहेत. सर्वांना हक्काची घरं देणारे सरकार अद्याप त्यांच्यापर्यंत पोहचले नसल्याने गवताच्या झोपडीत त्या राहत आहेत.
गावात ग्रामपंचायत आहे. मात्र, गावाबाहेर राहणाऱ्या या दोन महिलांपर्यंत घरकुल योजना पोहोचलेली नाही. घरी त्या झऱ्याचे पाणी आणतात. पावसाळ्यात लवाचे पाणी गोळा करुन आपली तहान भागवतात. उज्वला त्यांची घरी पोहचली नसल्याने लाकूकफाटा तोडून आपल्या चुली पेटवून दिवस कंठीत या मायलेकी दिवसाला धीराने सामोरे जाऊन संघर्ष करत आहेत. रखमाबाई आता वृद्ध झाल्या आहेत. तर तुळसाबाई यांना सोमा आणि रामा हे दोन मुले आहेत. पती अर्ध्यावर संसार सोडून गेला.
पतिच्या निधनानंतर तुळसाबाई गावाबाहेर आईच्या झोपडी शेजारी आपली झोपडी बांधून रहात आहे. पावसाळ्यात गवताची झोपडी गळत असल्याने एक शेळी विकून त्यांनी झोपडीवर प्लास्टीकचा कागद आणून छतावर टाकला. या आदिवासी ठाकर समाजाच्या स्वत:ला आधार नसला तरी आपल्या बाळांना सांभाळत आलेला दिवस काढत आहेत. मात्र, अद्याप एकही सरकारी अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहचला नाही किंवा साधी त्यांची विचारपूस देखील केलेली नाही. सरकारी योजना येतात आणि जातातही, पुढाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या मर्जीतलील लोक या योजनांचा दुप्पट-तिप्पट फायदा घेतात. मात्र, ज्यांना खरी गरज आहे त्यांना मात्र उपेक्षीतच रहावे लागते. त्यांच्यासाठी कोणीही पुढे येत नाही.