राज्य प्रवेशबंदी, जिल्हाबंदी,संचारबंदीची कठोर अंमलबजावणी ; पोलिसांना संपूर्ण स्वातंत्र्य, नागरिकांनी घरी बसून सहकार्य करावे : अजित पवार

मुंबई,पोलीसनामा ऑनलाइन –  ‘कोरोना’च्या संसर्ग प्रतिबंधासाठी लागू केलेल्या राज्य प्रवेशबंदी, जिल्हा प्रवेशबंदी आणि संचारबंदीसारख्या निर्णयांची अंमलबजावणी राज्यात कठोरपणे करण्यात येईल, त्यासाठी पोलिसांना कारवाईचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. भाजीपाला, फळे, दूध, अन्नधान्य आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करु नये. ‘कोरोना’च्या धोक्यापासून दूर राहण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची स्वत:ची असून त्याप्रमाणे त्यांनी वर्तन ठेवावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

राज्यात संचारबंदी लागू असतानाही काही नागरिकांकडून बाजारात खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. नागरिक अकारण गाड्या घेऊन रस्त्यावर उतरत आहेत. ‘कोरोना’च्या संसर्गाचा धोका वाढत आहे. राज्यशासनाचा आरोग्य विभाग, पोलिस विभाग, महापालिका, नगरपालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे, प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी जे सर्वजण जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. राज्याच्या प्रत्येक घरातला माणूस ‘कोरोना’च्या संसर्गापासून मुक्त रहावा यासाठी ते धोका पत्करत असताना, जनतेनेही संयम पाळून शासनाच्या प्रयत्नांना साथ द्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

‘कोरोना’च्या संसर्गापासून स्वत:ला आणि कुटुंबाला वाचवण्याची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकाची आहे. ‘कोरोना’चे गांभीर्य ओळखून सर्वांनी घरी बसावे, व सहकार्य करावे. सुदैवानं, राज्यातला ‘कोरोना’चा प्रसार अद्याप मर्यादित आहे. काही बाधित व्यक्ती ‘कोरोना’मुक्तही झाल्या आहेत, ही चांगली लक्षणं असल्याचे सांगून, ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येकानं घरी बसून योगदान द्यावं, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

मा. उपमुख्यमंत्री यांच्या आवाहनातील मुद्दे…
▪ राज्यप्रवेशबंदी, जिल्हा प्रवेशबंदी, संचारबंदीची कठोर अंमलबजावणी,
▪पोलिसांना अंमलबजावणीसाठी संपूर्ण स्वातंत्र्य
▪ नागरिकांनी घरीच थांबून सहकार्य करावं. खरेदीसाठी बाजारात गर्दी करु नये.
▪भाजीपाला, फळे, अन्नधान्य जीवनावश्यक पुरवठा सुरळीत ठेवणार.
▪जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवणं ही सरकारची जबाबदारी.
▪कृषी उत्पन्न बाजार समितीतील आवक सुरळीत ठेवणार
▪भाजीपाला, फळ उत्पादक शेतकऱ्यांचा माल बाजारात येणार, त्यांचं नुकसान होणार नाही,
▪राज्यातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, पोलिस चांगलं काम करत आहेत.
▪आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी उपाययोजना सुरु, व्हेंटीलेटर्सची संख्या वाढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु.
▪मास्क, सॅनिटायझर, औषधांचे, जीवनावश्यक वस्तूंचा अवैध साठा, काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन तुरुंगात टाकणार.