मुनगंटीवारांचा ‘त्या’ विधानावरून ‘यू-टर्न’ म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधानसभेत शिवसेनेची फसवणूक केली असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले विधान त्यांच्याच अंगलट आले असून आता त्यांनी याच विधानावरून यू-टर्न घेतला आहे. ते विधान टोल्याला प्रतिटोला होते, अशी सारवासारव त्यांनी केली.

याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले असून भाजप हा राजकारणात विशिष्ट मूल्ये घेऊन काम करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारा पक्ष आहे. शिवसेना आणि आमची अनेक वर्षाची युती होती. अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला फसवू नये, अशा अर्थाचे माझे वक्तव्य आहे. ज्या शिवसेनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळाले त्या शिवसेनेने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्पात आवश्यक त्या तरतुदी केल्या गेल्याच नाहीत. एका अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला फसवलेच आहे, असे मी म्हणालो, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

पुढे मुनगंटीवार म्हणतात, समोरच्या बाकावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याने भाजपाने चूक केली म्हणून शिवसेना आमच्याकडे आली, असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना मी उपहासात्मक उत्तर दिले. मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास गेला गेला. अनेक वर्षे मित्र असलेल्या पक्षाला फसविण्याची आमची वृत्ती नाही. अकाली दलासारख्या पक्षाबरोबर आमची 40-50 वर्षापासूनची युती आहे. शिवसेनेबरोबरही 30 वर्षे आमची मैत्री होती. मित्र पक्षाला फसवण्याचे काम आमच्या हातून कधीच झालेले नाही आणि भविष्यातही होणार नाही. माझ्या वक्तव्याचा कृपा करून चुकीचा अर्थ काढला जाऊ नये, असेही त्यांनी म्हटले आहे.