सर्वसामान्यांना मोठा झटका ! दूध, साखर आणि चहा पावडरच्या दरात वाढ

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना महागाईचा फटका सहन करावा लागत आहे. अगोदरच भाज्या आणि डाळींचे भाव गगनाला भिडल्यानंतर आता जीवनावश्यक असलेल्या साखर, दूध आणि चहा पावडरच्या किमतीत वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे.

30 नोव्हेंबर रोजी ग्राहक मंत्रालयाच्या वेबसाइटवर दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील किरकोळ बाजारात साखरेची सरासरी किंमत 39.68 रुपये प्रतिकिलो होती. ती 7 डिसेंबरला 43. 38 रुपयांवर गेली आहे, तर खुल्या चहाच्या दरातही 11.57 टक्क्यांनी वाढ झाली आहे. चहाच्या पावडरचे दर 238.42 रुपयांवरून 266 रुपयांवर पोहाेचले आहेत. याशिवाय, दुधाच्या किमतीतही जवळपास 7 टक्के वाढ होत आहे. दुधाची किंमत 46.74 रुपयांवरून 50 रुपये प्रतिलिटर झाली आहे.

टोमॅटोच्या किमतीतही वाढ

या दिवसात टोमॅटोची मागणीही वाढत आहे. 30 नोव्हेंबरपासून 7 डिसेंबरपर्यंत टोमॅटो 37.87 टक्के महाग झाले आहेत. दरम्यान, 30 नोव्हेंबरला टोमॅटोची किंमत किरकोळ बाजारात सुमारे 49.88 रुपयांवर पोहोचली आहे. 30 नोव्हेंबरला 36.18 रुपये प्रतिकिलो दराने टोमॅटो विकला गेला.

तेलाच्या दरात दिलासा

खाद्य तेलांच्या दरात घट झाली आहे. पाम तेलाची किंमत 102 रुपयांवरून 92 रुपयांवर आली आहे. याशिवाय सूर्यफूल तेलाची किंमत 124 रुपयांवरून 123 रुपयांवर आली आहे. शेंगदाण्याचे तेल 156 रुपयांवरून 145 रुपये आणि मोहरीचे तेलही प्रतिलिटर 135 रुपयांवरून 132 रुपयांवर आले आहे, तर सोया तेलाच्या किमतींमध्ये 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पीठ, तांदूळ आणि गहू झाले स्वस्त

गहू, तांदूळ आणि पिठाच्या किमतीत सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. गव्हाच्या किमतीत सुमारे 19.45 टक्क्यांनी घट झाली आहे. यावेळी गव्हाची किंमत 29 रुपयांवरून 24 रुपयांवर आली आहे. याशिवाय किरकोळ बाजारात पिठाची किंमत 32 रुपयांवरून 28 रुपयांवर आली आहे. तसेच, तांदळाचे दरही घसरले आहेत, तर हरभरा आणि उडीद डाळ स्वस्त झाली आहे.