PM मोदींना ‘चौकीदार चोर है’ म्हटल्याने राहुल गांधींना नोटीस ; 3 ऑक्टोबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश

मुंबई : वृत्तसंस्था – लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकमेकांवर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून यथेच्छ टीका केली होती. याच टीकेमुळे देशातील विविध ठिकाणांवर दाखल झालेल्या याचिकांमुळे काँग्रेसचे राहुल गांधी चांगलेच अडचणीत आले आहेत. जयपूरच्या येथे झालेल्या एका सभेत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदिंविरोधात, “गली गली मे शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है” असे नारे दिले होते. ही सभा २० सप्टेंबर २०१९ ला झाली होती. यानंतर एक ट्वीट करुन राहुल गांधींनी मोदींना उद्देशून अपमानकारक, मानहानीकारक विधाने केली होती. त्याचबरोबर राफेल विमान खरेदी व्यवहारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त टीका केल्याच्या आरोप भाजप कार्यकर्त्याकडून होत आहे. या सर्वामुळे तमाम भारतीयांची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलीन झाल्याचा दावा करत भाजपचे कार्यकर्ते महेश श्रीश्रीमल यांनी राहुल गांधींविरोधात याचिका दाखल केली आहे.

राहुल गांधींना ३ ऑक्टोबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश :
दरम्यान दाव्यावर फौजदारी कारवाई सुरु करण्याचे आदेश गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिले असून त्याबाबत राहुल गांधींना समन्स बजावत ३ ऑक्टोबरला कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. या याचिकेशिवाय राहुल गांधी यांच्याविरोधात याशिवाय भिवंडी आणि शिवडी न्यायालयातही मानहानीच्या तक्रारी प्रलंबित आहेत. तक्रारदार हे भाजपचे सदस्य असल्यामुळे ते अशाप्रकारची तक्रार करण्याचा अधिकार त्यांना आहे, असं मत व्यक्त करत या कोर्टानं हे समन्स जारी करत राहुल यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

भाजप कार्यकर्ते महेश श्रीश्रीमल यांनी दाखल केलेल्या याचिकेत राहुल गांधी यांनी जयपूर, राजस्थान, अमेठी येथील दौऱ्यामध्ये केलेल्या विधानांचा देखील समावेश आहे. राफेलबाबत टीका करताना मोदी यांच्यावर ‘कमांडर इन थीफ’, ‘चौकीदार चोर है’, ‘चोरो का सरदार’अशी टीका राहुल गांधींनी केली होती. त्यामुळे मोदींबरोबरच भारतीय जनता पार्टी व त्यातील सदस्यांचीही प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे राहुल यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. या दाव्यावर पुढील सुनावणी 3 ऑक्‍टोबर रोजी होणार आहे. त्यासाठी राहुल यांनी हजर राहावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –