पर्युषण काळात मुंबईतील जैन मंदिरं दोन दिवस उघडणार, SC ची परवानगी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संकटामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच दरम्यान येणाऱ्या सण उत्सवावर देखील मर्यादा आल्या आहेत. कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून प्रत्येक सणासाठी सरकारकडून नियमावली ठरवली जात आहे. विशेष गर्दी टाळण्याच्या उद्देशाने राज्यातील सर्व प्रार्थनास्थळं बंद ठेवण्यात आली आहे.

जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वालाही सुरुवात झाली असून मंदिर उघडणार की नाही, अशी चर्चा सुरु होती. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मुंबईतील तीन ठिकाणी जैन मंदिर उघडण्याची परवानगी दिली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून सण आणि उत्सव साधे पणाने साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले होते. सध्या जैन बांधवांचा पर्युषण पर्वाला सुरुवात झाली आहे. या काळात मुंबईतील जैन मंदिरं खुली करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने मंदिरं उघडण्यास परवानगी दिली आहे.

मुंबईतील तीन ठिकाणी मंदिर खुली करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. यामध्ये दादर, भायखळा आणि चेंबूर येथील जैन मंदिरं प्रार्थनेसाठी खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पर्युषण पर्वाच्या अखेरचे दोन दिवस मंदिर उघडण्यात येणार आहे. 22 आणि 23 ऑगस्टला मंदिरं खुली राहणार आहेत. मंदिरं खुली केल्यानंतर केंद्र सरकारनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या नियमांचं पालक करण्यात यावे, असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.