नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी क्रिकेटपटू एस. श्रीसंतला सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला आहे. बीसीसीआयने श्रीसंतला सुनावलेल्या आजीवन बंदीचा तीन महिन्यात पुनर्विचार करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या पीठानं हा निर्णय दिला आहे.
A bench of the Supreme Court, headed by Justice Ashok Bhushan, asked the BCCI to decide afresh on the point of quantum of punishment given to S Sreesanth https://t.co/tYPkyXTX59
— ANI (@ANI) March 15, 2019
स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळल्याने श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला श्रीसंतची बाजू ऐकून घेऊन त्यावर ३ महिन्याच्या आत पुनर्विचार करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त करताना श्रीसंत म्हणाला की, ‘या निर्णयाबद्दल मी न्यायालयाचे आभार मानतो. मला लवकरच क्रिकेटच्या मैदानावर उतरायचे आहे.’
श्रीसंत २०१३ मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकला होता. त्यानंतर बीसीसीआयकडून त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. श्रीसंतने बंदी उठवण्यासाठी बीसीसीआयकडे अपील केले होते. मात्र त्याचा अर्ज फेटाळण्यात आला होता. क्रिकेटमधील गैरप्रकारांवर कुणाचीही गय केली जाणार नाही, असा पवित्रा बीसीसीआयने घेतला होता.