EVM आणि VVPAT मशीनबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासून वापरण्यात येत असलेल्या EVM वर घेण्यात येत असलेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने EVM आणि VVPAT मशीनबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील किमान पाच बुथवरील EVM मध्ये नोंद झालेली मते आणि VVPAT मशीनमधील चिठ्ठ्यावर नोंद झालेली मते यांची पडताळणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे निकाल लांबण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या EVM आणि VVPAT ची पडताळणी करण्याची मागणी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह २१ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आज या याचिकेवर निकाल दिला आहे. EVM आणि VVPAT मशीनमध्ये नोंद झालेल्या मतांची पडताळणी करण्यासाठी आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एक ऐवजी पाच EVM आणि VVPAT ची पडताळणी करण्यात यावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पूर्वी एका मशिनची पडताळणी होत होती.

१ एप्रिलपासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार असल्याने याबाबतचा निकाल लांबवता येणार नसल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. ५० टक्के EVM आणि VVPAT पडताळणीची मागणी झाल्यानंतर पडताळणीसाठी मोठ्या प्रमाणात सक्षम कर्मचारी वर्गाची आवश्यकता भासेल असे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते. तसेच मोठ्या सभागृहाची आवश्यकता भासेल. अनेक राज्यांमध्ये मोठ्या सभागृहांचा प्रश्न आहे. अशा समस्या आयोगाने न्यायालयात सांगितल्या होत्या. अखेर त्यावर तोडगा काढत सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.