व्हीव्हीपॅट विरोधात सर्वोच्च न्यायालयात  विरोधकांची याचिका दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – व्हीव्हीपॅटमध्ये होणारी २ टक्के मतांची मोजणी ही ५० टक्क्यांपर्यंत व्हावी अशी मागणी करत विरोधी पक्षांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यानंतर याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून निवडणूक आयोगाने २२ मार्चपर्यंत आपले म्हणणे मांडावे असेही सांगितले आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

आज शरद पवार यांनी मुंबई येथील विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर देशातील महत्त्वाच्या काही मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केल्याचे दिसून आले.पुढे बोलताना पवार म्हणाले की, “नागपूरला ११ एप्रिलला मतदान आहे, त्याच दिवशी काटोल विधानसभेची पोटनिवडणुक आहे. काटोल विधानसभेसाठी मतदान घेऊ नये. कारण तीन महिन्यांसाठी ही निवडणूक घेऊ नये, अशी आमची मागणी होती. कारण काटोल विधानसभेत निवडून आलेल्या व्यक्तीला फक्त तीन महिन्यासाठी काम करता येणार आहे.

निवडणूक आयोगाने ही निवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे माझे सर्व राजकीय पक्षांना आवाहन आहे की, सगळ्यांनी एकत्र बसावे आणि अर्जच भरु नये. निवडणूक आयोगाने तरीही निवडणूक रद्द केली नाही तर सर्व पक्षांनी मिळून एकच सामाजिक क्षेत्रातील कोणाला तरी उमेदवारी द्यावी” असे पवार यावेळी म्हणालेत.