सुप्रीम कोर्टानं सुधा भारव्दाज यांचा जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी सुधा भारद्वाज यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे. गुरुवारी शिखर न्यायालयानं मेडिकल आधारावर दाखल करण्यात आलेला सुधा भारद्वाज यांच्या अंतरिम जामीन अर्जावर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून नकार देण्यात आला. सोबतच, गुणवत्तेच्या आधारावर जामीन अर्ज दाखल करण्याचा सल्लाही सुधा भारद्वाज याना न्यायालयाकडून देण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती यू यू ललित यांनी ‘तुम्ही मेडिकलच्या आधारावर का संपर्क केलाय? रक्तशर्करेचं प्रमाण योग्य आहे.

मेडिकल चाचणीच्या आधारावर दाखल केलेल्या या जामीन अर्जावर आम्ही तुमची साथ देऊ शकत नाही. तुम्ही गुणपत्तेच्या आधारावर जामीनासाठी का अर्ज करत नाही?’ असा प्रश्न न्यालयालयाकडून विचारण्यात आला आहे. यावर सुधा भारद्वाज यांच्या वकील वृंदा ग्रोवर यांनी आपली याचिका मागे घेतली. सुधा भारद्वाज यांच्याजवळ कोणतंही आक्षेपार्ह सामान आढळलं नसल्याचंही यावेळी नमूद करण्यात आले. २८ ऑगस्ट रोजी एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी प्रोफेसर सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आला होता. सुधा भारद्वाज सध्या मुंबईतील भायखळा तुरुंगात आहेत. प्रकृती अस्वास्थ्याचं कारण पुढे करत त्यांच्याकडून जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाकडून राज्य सरकारने दाखल करण्यात आलेल्या शपथपत्राचाही विचार करण्यात आला. यामध्ये २१ ऑगस्टच्या प्रकृती चाचणीचा अहवालही समाविष्ट करण्यात आला होता. या अहवालात सुधा भारद्वाज यांची प्रकृती सामान्य असल्याचा उल्लेख केला आहे. गरज भासल्यास सुधा भारद्वाज यांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात येईल.

याअगोदर याच प्रकरणातील दुसरे आरोपी वरवरा राव यांच्या प्रकरणातही त्यांना ही सुविधा मिळाली होती, असेही न्यायालयाकडून स्प्ष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी एल्गार परिषद – कोरेगाव भीमा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्ता सुधा भारद्वाज यांच्या जामीन याचिकेला एनआयएकडून विरोध दर्शवण्यात आला होता. सुधा भारद्वाज यांची प्रकृती उत्तम असल्याचं एनआयएनं मुंबई उच्च न्यायालयात सांगण्यात आलं होतं. जर गरज भासली तर भायखळा तुरुंगातील अधिकारी सुधा भारद्वाज यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी सक्षम आहेत, असंही एनआयएकडून सांगण्यात आलं होतं.