देशाचे इंग्रजी नाव ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ करण्याची मागणी, सुप्रीम कोर्टात 2 जूनला सुनावणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशाचे इंग्रजी नाव इंडिया बदलून भारत करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी घेण्यात आली आहे. सुप्रीम कोर्ट याप्रकरणी 2 जून रोजी सुनावणी करणार आहे. ही याचिका नमह नावाच्या व्यक्तीने दाखल केली आहे.

अगोदर या याचिकेवर आज म्हणजे शुक्रवारी सुनावणी होणार होती, परंतु मुख्य न्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अनुपस्थितीच्या कारणामुळे ती पुढे ढकलण्यात आली. आता ही याचिका 2 जून रोजी मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर सादर करण्यात येईल.

याचिकेत दावा करण्यात आला आहे की, भारत किंवा हिंदुस्तान शब्द आपल्या राष्ट्रीयतेचा गौरव दर्शवतात. याचिकेत सरकारला संविधानाच्या कलम 1 मध्ये दुरूस्तीसाठी योग्य पावले उचलून इंडिया शब्द हटवून, देशाला भारत किंवा हिंदुस्तान म्हणण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे. हे कलम या गणराज्याच्या नावाशी संबंधीत आहे.

ही याचिका दिल्ली येथील एका रहिवाशाने दाखल केली असून दावा केला आहे की, ही दुरूस्ती देशातील नागरिकांची पारतंत्र्याच्या भूतकाळातून मुक्ती झाल्याची खात्री देईल. याचिकेत 1948 मध्ये संविधान सभेत संविधानाच्या तत्कालीन मसुद्याच्या कलम 1 वर झालेल्या चर्चेचा हवाला दिला आहे आणि म्हटले आहे की, त्यावेळी देशाचे नाव भारत किंवा हिंदुस्तान ठेवण्यासाठी जोरदार बाजू मांडण्यात आली होती.

याचिकेनुसार, हे इंग्रजी नाव बदलणे सांकेतिक वाटत असले तरी भारत शब्दामुळे आपल्या पूर्वजांच्या स्वातंत्र्य संग्रामाचा न्यायोचित गौरव करण्यासारखे आहे. ही योग्य वेळ आहे की, देशाला भारत या त्याच्या मुळ आणि प्रामाणिक नावाने ओळखले जावे.

या याचिकेवर तत्कालीन मुख्य न्यायाधीश एच. एल. दत्तू आणि न्यायाधीश अरुण मिश्रांच्या पीठाने सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांना नोटीससुद्धा जारी केली होती. याचिकेत मागणी करण्यात आली होती की, केंद्र सरकारला कोणत्याही सरकारी कामासाठी अधिकृत पत्रांमध्ये इंडिया नावाचा वापर रोखण्यात यावा.