“राज्य शासनानं धनगर आरक्षणाबाबत कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही”

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्र सरकार आणि राज्य सरकार धनगर समाजाची फसवणूक करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. राज्य शासनानं धनगर आरक्षणाबाबत कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही. त्यामुळे हा विषय रेंगाळत पडल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.

मुंबईत मतोश्रीवर शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धनगर आरक्षणावरून बैठक पार पडली. मात्र ती बैठक निष्फळ ठरली. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. बैठक निष्फळ ठरली याबद्दल आश्चर्य वाटत नाही. बारामतीत जेव्हा आंदोलन झालं तेव्हाच हे आश्वासन फसवं असल्याचं जाणवलं होतं, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

राज्य सरकारनं आजपर्यंत धनगर आरक्षण प्रस्तावाचा एकही कागद दिलेला नाही. केंद्र आणि राज्यातलं भाजप सरकार केवळ या कष्टकरी समाजाची फसवणूक करत आहे. हे सरकार कष्टकरी, शेतकरी, कामगार, महिला यांच्या हिताविरोधातलं सरकार आहे. त्यांना आजतागायत या घटकांचे प्रश्नच समजले नाहीत. शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं काम या सरकारनं केलं आहे. शेतकऱ्यांचं खच्चीकरण केलं आहे, असे आरोप त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, सरकारच्या धोरणांमुळेच हा देश विकासात मागे पडला आहे. चुकीचं काम करणाऱ्या सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. त्यामुळं देशात आणि राज्यात महाआघाडी करुनच निवडणुका लढवल्या जाणार आहेत, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.