बळीराजाच्या जीवावर उठणाऱ्या पदाधिकाऱ्यावर कारवाई करणार का ? ; सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना भाजपचाच किसान मोर्चाचा जिल्हाध्यक्ष दुसरीकडे शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसंच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

जालन्यात शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण करुन संपुर्ण कुटुंबालाच जेसीबीच्या सहाय्याने खड्ड्यात पुरण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती भाजपची पदाधिकारी आहे. काही दिवसांपुर्वी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडे घातक शस्त्रास्त्रे सापडली. त्यावेळी आपण काही बोलला नाहीत, असं ट्वीट सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्‍यांना उद्देशून केलं आहे.

तसंच आता मात्र थेट जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाच्या जीवावर उठणाऱ्या आपल्या पदाधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का? आपले गृहमंत्रालय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासंदर्भात काय करतेय? तुम्हाला उत्तर द्यावेच लागेल? जालना जिल्ह्यात घडलेल्या या भीषण घटनेचा निषेध, असंही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा गावातील शेतीच्या वादातून किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर यांनी ही मारहाण केली, असा आरोप शेतकरी विठ्ठल खांडेभराड आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.