रिक्षावाल्याच्या अतिघाईने भीषण अपघात ; ८ वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू ५ विद्यार्थी जखमी 

सुरत : वृत्तसंस्था – मुलांना शाळेत पोहचवण्यासाठी बरेच पालक रिक्षा लावतात. रिक्षा चालकाने शाळेच्या वेळेच्या आधीच मुलांना न्यायला येणे अपेक्षित असते पण सुरत मधील एका घटनेत रिक्षावाल्याला मुलांना न्यायला यायला उशिरा झाला. शाळेची वेळ सकाळी ७ ची होती. सर्व मुले नियोजित वेळेत शाळेला जाण्यासाठी तयार होती. मात्र ठीक ७ वाजता रिक्षाचालक आला. त्याने मुलांना शाळेत सोडण्यासाठी घाई केली. सुसाट वेगाने तो निघाला आणि पुढे जाऊन या रिक्षाचा भीषण अपघात घडला. या अपघातात एका विद्यर्थ्याचा मृत्यू झाला असून इतर पाच मुले गंभीर जखमी झाली आहेत.
असा घडला अपघात
जखमींपैकी एका मुलाने सांगितल्याप्रमाणे, ऑटो ड्रायव्हर शुक्रवारी आपली गाडी घेऊन सकाळी ७ वाजता मुलांच्या घराजवळ पोहोचला. शाळेची वेळ ७ वाजताची होती. उशीर झाल्याने त्याने घाई करून सर्वांना ऑटोरिक्शामध्ये बसवले आणि सुसाट वेगाने निघाला. याच दरम्यान सुरतच्या पीयूष पॉइंटजवळ त्याने अचानक ब्रेक लावला. ब्रेक लावताच भरधाव ऑटोचा तोल गेला आणि एक ८ वर्षांचा मुलगा बाहेर पडला. त्याच मुलाच्या अंगावर ऑटो पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. उर्वरीत जखमी मुलांना रुगणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी काहींना प्राथमिक उपचार करून तर काहींना दाखल करावे लागले. पोलिसांनी या प्रकरणी ऑटो रिक्शा चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू आहे.
संतप्त पालकांकडून प्राचार्याला मारहाण
अ‍ॅडम्स पब्लिक स्कूलमध्ये मुलांना ये-जा करण्यासाठी बसची व्यवस्था होती. परंतु, बस बिघडल्याने कित्येक दिवसांपासून शाळेने ऑटोरिक्शाचा बंदोबस्त केला होता. यासाठी एका-एका मुलाच्या पालकाकडून मासिक ४०० रुपये घेतले जात होते. शाळेच्या ऑटो रिक्शात मुलांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी ग्रिल लावल्या जातात. परंतु, या ऑटोमध्ये तशी काहीच व्यवस्था नव्हती. ऑटो स्लिप होताच मुलगा बाहेर फेकल्या गेला. या दुर्घटनेनंतर पालकांना शाळेला घेराव घातला. तसेच प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये जाऊन त्याची धुलाई देखील केली.