सुशांत सिंह राजपूत प्रकरण ! आदित्य ठाकरेंवर कथित आरोप, दिल्लीच्या वकिलाला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियान यांच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्या वकिलाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम शाखेनं ही कारवाई करत दिल्लीचा वकिल विभोर आनंद याला ताब्यात घेतलं आहे. आनंद वकिल असल्याचा दावा करत आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी युवासेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे आणि इतर बाबतीत वादग्रस्त पोस्ट, व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याचे त्याच्यावर आरोप आहेत. आनंदचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड झालं आहे.

आनंदनं कथितरित्या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सुशांत आणि दिशाच्या मृत्यूशी संबंध जोडणाऱ्या वक्तव्याचा व्हिडीओ युट्युबवर पोस्ट केला होता. आनंदच्या या व्हिडीओत दिशा सालियानची हत्या होण्याआधी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता असा दावा केला होता. या प्रकरणी आनंदनं बॉलिवूडमधील अनेक लोक आणि महाराष्ट्रातील एका नेत्याचं नाव घेतलं होतं.

19 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी
पोलिसांनी सांगितल्यानुसार, शहर न्यायालयाकडून इशारा दिल्यानंतरही आनंद (31) सतत सोशल मीडियावर खोट्या आणि वाटेल तशा पोस्ट लिहित होता. यात अनेक व्यक्तींवर गंभीर आरोपही करत होता. पोलिसांनी त्याला दिल्लीतील राहत्या घरातून ताब्यात घेतलं आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्याला मुंबईत आणण्यात आलं. विभोरला 19 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आनंदच्या वकिलानं सांगितलं की, पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा हा राजकारणातून प्रेरीत आहे. माझ्या अशिलानं केवळ त्याचे विचार व्यक्त केले होते. बॉम्बे सिव्हील कोर्टानं वादग्रस्त पोस्ट हटवण्याचा आदेश दिला होता.