‘सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नव्हे तर हत्या’, माजी मुख्यमंत्र्यांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली आहे असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे. राज्य सरकार कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. अद्याप या प्रकरणी एफआयआर दाखल झालेली नाही असंही ते म्हणाले आहेत.

नारायण राणे म्हणाले, “सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कुणालातरी वाचवण्यासाठी सरकार चौकशीत टाळाटाळ करत आहे. सुशांत सोबत 13 आणि 8 तारखेच्या पार्टीत कोण होतं हे मुंबई पोलिसांना माहित नाही का ? सगळ्या गोष्टी लपवल्या जात आहेत. गुन्हेगारांना वाचवण्यासाठी सरकार काम करत आहे. रियाला शोधून चौकशी करायला हवी. दिनू मोर्याच्या घरी पार्टीला मंत्री काय करतात ?” असा सवाल देखील राणे यांनी केला आहे.

राज्य सरकारवर इतर आरोप करताना राणे म्हणाले, “पाऊस पडला म्हणून मंत्रालयाला सुट्टी दिली का ? कोरोना बाधितांना बरं करून घरी पाठवा. कोरोना रुग्णांच्या मृतांची संख्या कमी करून दाखवा. काम न करण्याचं सरकारचं धोरण आहे” असंही ते म्हणाले आहेत.

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस विरूद्ध बिहार पोलीस असा वाद रंगला आहे. अशातच सेलिब्रिटी आणि राजकारण्यांसह अनेक लोक सुशांतच्या सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत.