सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतरचा वाद, राज ठाकरेंनी केला ‘हा’ मोठा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक वादा समोर आले. मुंबई पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून अनेक बड्या मंडळींना चौकशीसाठी बोलावलं आहे. हा तपास सुरु असतानाच महाराष्ट्र नव निर्माण सेनेची भूमिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यावर बॉलिवूडमध्ये वेगळी चर्चाही सुरु झाली होती. त्या वादावर आता खुद्द राज ठाकरे यांनीच आपली भूमिका मांडत खुलासा केला आहे. मनसेने अशी कोणतीही भूमिका घेतली नसल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या नवोदितांचा छळ केला जातो अशी चर्चा सुरु झाली होती. त्याच छळामुळे सुशांतला नैराश्य आलं होतं असेही म्हटले जात होते. त्यामुळे अशा छळ होणाऱ्या कलाकारांनी काही अडचण असल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधावा. त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी हा खुलासा केला आहे. मनसेची ही भूमिका नसल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलं असून त्यामुळे एका वादावर आता पडदा पडला आहे.

अभिनेता सुशांतच्या आत्महत्येचा तपास अद्याप अंतिम टप्प्यामध्ये आलेला नाही. या प्रकरणी आता त्या हिरव्या कपड्याच्या क्षमतेची तपासणी होणार आहे. खरंच सुशांतने त्या कपड्याचा वापर करून आत्महत्या केली का याबाबत तपास केला जाणार आहे. यामध्ये त्या कपड्याची क्षमता सुशांतचे वजन पेलवणारी होती का, याबाबत तपास केला जाणार आहे.