“यंदा भाजप जिंकली तर ही देशातील शेवटची लोकसभा ठरेल”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. सत्ताधारी हे राक्षस आहे, असा उल्लेख सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील वडाळा येथील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मनोमिलन मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

सत्ताधारी हे राक्षस आहेत. त्यांनी जर लोकसभा निवडणूक जिंकली तर ही देशाची शेवटची निवडणूक असेल. कारण मोदी यांच्यात हुकूमशहा ठासून भरला आहे, असा आरोप शिंदे यांनी केला आहे.

सोलापूर लोकसभा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार सुशीलकुमार शिंदे मानले जातात. त्यामुळे प्रचाराचे नियोजन करण्यासाठी तालुक्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांनी घेतली. यावेळी त्यांनी तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या जीवावरच माझे दिल्लीत ‘दुकान’ चालते, असेही कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले.